सातारा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण येथे शनिवारी (दि. २८) आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण पालिकेच्या वतीने विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली.
पालखी मार्गाची व वाहतूक मार्गाची डागडुजी करण्यात आली आहे. पुलांचे तुटलेले रेलिंग बसवण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील दगड, माती उचलण्याचे आणि स्वच्छता करण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.
वारकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रावर कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी एकाच वेळी अनेक पाणी टँकर भरू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वारकऱ्यांचे मालवाहतूक ट्रक व अन्य वाहनांसाठी विशेष मार्गाची आखणी केली आहे.
पालखीतळावर पावसामुळे अडचण निर्माण होऊ नये यासाठी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. पालखीतळाची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. पालखीतळावरील विद्युत रोषणाई, लाइटसाठी आठ सॅटेलाइट पॉइंट, छोट्या-मोठ्या जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
पालखीतळावरील दर्शन बारीची व्यवस्था पूर्ण झाली आहे. तसेच तात्पुरत्या शौचालयाची, स्नानगृहाची सुविधा व त्या ठिकाणी लाईटची सुविधा देण्यात येणार आहे. यंदा पावसामुळे पालखीतळावर लाल मातीऐवजी कच टाकली आहे.
या वर्षी प्रथमच जर्मन मंडपाच्या माध्यमातून वारकरी सेवा केंद्र यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी उभे करण्यात आले आहे. येथे १५० डॉक्टर वारकऱ्यांची सेवा करणार आहेत. या ठिकाणी महिला आणि पुरुष वारकरी यांच्यासाठी स्नानगृहाची उभारणी सुरू आहे. पालखीतळावर कोणत्याही प्रकारचे हातगाडे, हॉटेल लागणार नाहीत याचसाठी पालिकेचे फिरते पथक तैनात करण्यात येणार आहे.
पालखीतळावर आरोग्य विभागामार्फत तात्पुरते दवाखाने तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी हिरकणी कक्ष आणि वारकऱ्यांसाठी २० फिजिओथेरपिस्ट तैनात असल्याचेही मुख्याधिकारी मोरे यांनी सांगितले. या सर्व कामांमध्ये शहरातील सर्व पदाधिकारी, नागरिक यांचे सहकार्य मिळत आहे.