सातारा : माण, खटाव, फलटण या सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी असलेल्या तालुक्यांना गेल्या दोन दिवसांत पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे फलटण येथील बाणगंगा आणि माण तालुक्यातील माणगंगा नद्यांना पूर येत त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुष्काळी खटाव तालुक्यातील येरळा नदीला पूर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली.
फलटण, माण, खटाव तालुक्यांत अनेक रस्ते पाण्याखाली गेले. शिखर शिंगणापूर, फलटण येथील धुमाळवाडी, आसू, कोळकी, जावळी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. फलटण तालुक्यात २५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या २४ ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागले. यामुळे प्रशासनाने रस्ते बंद करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. फलटण, खटाव, माण, वडूज येथील ही जनजीवन विस्कळीत झाले आहे.
माण तालुक्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत. दहिवडी-फलटण रस्ता, शिंगणापूर- फलटण रस्ता, आंधळी-मलवडी रस्ता, मलवडी-कुळकजाई, राजवडी-बिजवडी या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ढगफुटीसदृश पावसाने ओढे, नाले, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. ऐतिहासिक पुष्करतीर्थ तलावाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. या पावसाने अनेक ठिकाणी शेती वाहून गेली. फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
माण तालुक्यातील आंधळी धरण भरून वाहू लागले. खटाव तालुक्यातील नेर तलाव भरून वाहत आहे. अनेक कोरड्या पाझर तलावात पाणीसाठा वाढल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तहसीलदार विकास अहिरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. खंडाळा तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला आहे अर्धा भुईमूग पिकाला फटका बसला आहे नुकसानग्रस्त भागाची तहसीलदार अमित पाटील यांनी पाहणी केली. फलटण, तरडगाव, बरड, विडणी कृषी मंडलात भुईमूग, कांदा, टोमॅटो, डाळिंब आदी पिकांचे नुकसान झाले आहे. बाणगंगा धरण ऐन उन्हाळ्यात पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे.
फलटण शहरासह ग्रामीण भाग पावसाने झोडपून काढला आहे. नागरिकांच्या मदतीसाठी फलटण, माण पोलीस ठाण्याची पथके गस्त घालत आहेत. फलटणच्या आठवडा बाजारावरही पावसाने पाणी फिरले आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील कांदा, मका, भुईमूग, भेंडी, गवार, वांग आदी तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. एकूणच या पावसाने दुष्काळी भागात सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे.
पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने नद्यांना पूर आले आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेले असल्याने नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी. पुराच्या पाण्यात शिरून आपला जीव धोक्यात घालू नये, तसेच कोणतीही अडचण असल्यास तत्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क करावा.- डॉ. अभिजित जाधव,तहसीलदार, फलटण