सातारा : माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यामध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. परंतु पावसाळा सुरू होण्याच्या आधीच झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीसाठी शासनाने निकष लावले आहेत. ते बदलावेत, लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अन्यथा आम्हाला सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गट नव्याने पदाधिकारी निवड करून नव्या जोमाने जिल्ह्यात कामाला लागेल याचेही त्यांनी सूतोवाच केले. साताऱ्यात राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तेजस शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, विजय बोबडे, अतुल शिंदे, शफीक शेख यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे. तत्पूर्वीच सातारा जिह्यातील दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे.
या भागात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होत असतो. हा पाऊस जिह्याच्या सर्वच तालुक्यात झाला आहे. त्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासासाठी शासनाकडून काही निकष लावले गेले आहेत. यापूर्वीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. तीही दिली गेली पाहिजे. पूर्वीच्या पंचनाम्यात किती शेतकरी मदतीवाचून राहिले आहेत याचीही माहिती आम्ही प्रशासनाकडून मागवली आहे. आताही जो निकष लावला आहे तो शिथील करून हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शासनाकडे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत हेही आम्हाला माहिती आहे. परंतु काहीही करून शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, मदत केली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देत ते म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिह्याला मदतीची वाढ मिळावी. जिह्यात चार मंत्री आहेत. त्याबाबत त्यांनी गांभीर्याने घ्यावे, पावसाळी अधिवेशनापूर्वी हे जाहीर करावे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यात नवीन धरणे बांधण्यापेक्षा आहे त्या धरणांचे कालवे दुरुस्त केले तर गळतीद्वारे जे वाया जाणारे पाणी वाचेल, त्याकरता नव्याने सोळशीसारखी धरणे बांधण्यापूर्वी सरकारने कालव्यांची कामे करावीत, त्यामुळे चार टीमएमसी पाणी वाढून ते शेतीला उपयोगात आणता येईल, अशीही सूचना त्यांनी केली. त्यांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी जिह्यात सत्ताधाऱ्यांनी कामे सुरू केली आहेत. त्या कामामध्ये काही तांत्रिक दोष आहेत. एकाच कंपनीकडे ठेके दिलेले आहेत. सुरूर-वाई रस्ता, महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्याचे काम, पाटण रस्ता, कोरेगाव रस्ता अशा सर्वच रस्त्यांची कामे वेगाने हाती घेतली असली तरीही होत असलेली कामे चांगल्या दर्जाची होत नाहीत, असाही आरोप त्यांनी केला. ही कामे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच केली जात असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले.