ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्यातर्फे १५ ते १७ मार्च या कालावधीत येथे रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी, अभिनव भारत संस्थेपासून शोभायात्रा व ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. संमेलनात सावरकर यांची दुर्मिळ छायाचित्रे तसेच शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाबरोबरच विविध विषयांवर नऊ सत्रांद्वारे मंथन केले जाणार आहे.
संमेलनाचे अध्यक्षपद संत साहित्य व सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक हे भूषविणार आहेत. संमेलनाच्या माध्यमातून सावरकर यांचे दुर्लक्षित राहिलेले पैलू समोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक अजय बोरस्ते यांनी सांगितले. गंगापूर रस्त्यावरील चोपडा लॉन्समध्ये होणाऱ्या संमेलनस्थळास ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहित्यनगरी’ असे नांव देण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता अभिनव भारत स्मारकापासून शोभायात्रा व ग्रंथदिंडी काढण्यात येईल. त्यात सावरकर साहित्यांचे दर्शन घडविणारे चित्ररथ सहभागी होणार आहेत. शहरातील प्रमुख मार्गावरून ही यात्रा संमेलनस्थळी जाईल. उद्घाटन सोहळ्यास २४ व्या सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर तसेच अभिनेते शरद पोंक्षे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी दहा वाजता ‘स्वा. सावरकरांचा जीवनपट’ (एक धगधगते अग्निकुंड) या सत्रात हनुमंत सोनकांबळे व दिलीप करंबेळकर तर साडेअकरा वाजता होणाऱ्या ‘साहित्यिक सावरकर’ सत्रात श्याम देशपांडे व डॉ. शुभा साठे सहभागी होणार आहेत. दुपारी ‘सावरकर आणि गुप्तहेर यंत्रणा’ या विषयावर दादुमियाँ मार्गदर्शन करतील तर ‘सावरकर आणि हिंदुस्थानची संरक्षण सिद्धता’ सत्रात कमांडर आगाशे, मेजर जनरल शशिकांत पित्रे, ब्रिगेडिअर हेमंत महाजन, सायंकाळी साडेपाच वाजता ‘सावरकरांच्या वाटेवर चालताना’ या सत्रात चित्रा फडके व चंद्रकला कदम यांचा सहभाग राहणार आहे. सायंकाळी सात वाजता ‘जयोस्तुते’ हा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुदेव अभ्यंकर, जितेंद्र अभ्यंकर, अभिषेक अभ्यंकर सादर करणार आहेत. संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी दहा वाजता ‘सावरकरांचा राष्ट्रवाद’ या सत्रात रमेश पतंगे व अविनाश कोल्हे, ‘स्वा. सावरकर हिंदुत्ववादी का बनले?’- शेषराव मोरे, ‘विज्ञाननिष्ठ सावरकर’ – अरुण करमरकर, ‘तरुणांचे प्रेरणास्थान – स्वा. सावरकर’ या विषयावरील सत्रात वा. ना. उत्पाद आणि वि. ह. भूमकर सहभागी होणार आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे.
संमेलनात वेगवेगळ्या प्रदर्शनांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्वा. सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविण्याच्या उद्देशाने अभिनव भारत संस्थेच्या सहकार्याने विविध माहितीने परिपूर्ण अशा दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचा समावेश आहे. कोल्हापूर येथील गिरीश जाधव यांच्या ‘शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्र प्रदर्शनाद्वारे अनोख्या इतिहासाचा पट उलगडला जाईल. गदा, धनुष्यबाण, तलवारी, परीघ, मुसळ, गुप्ती, भाला, कटय़ार, जांबिया, खंजीर, बिचवा, पेशकबज या शस्त्रास्त्रांसह चिलखत व अंगरखा हे सर्व एकाच ठिकाणी बघण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन संस्मरणीय करण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बोरस्ते व मंडळाचे अध्यक्ष शंकरराव गोखले यांनी केले आहे.
आज ४०० शाळांमध्ये ‘जयोस्तुते’ गायन
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात लिहिलेल्या ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ या कवितेचे समूहगान येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता केले जाणार आहे. १५ ते १७ मार्च या कालावधीत होणाऱ्या रौप्य महोत्सवी सावरकर साहित्य संमेलनानिमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महानगरातील ४०० शाळांमधील एक लाख विद्यार्थी आपापल्या शाळेत या गीताचे गायन करणार आहेत. १९०३ मध्ये पुणे येथील फग्र्युसन महाविद्यालयात शिकत असताना सावरकरांनी रचलेले हे अप्रतिम गाणे ‘स्वातंत्र्याचे स्तोत्र’ म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात अजरामर आहे. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी ‘स्वातंत्र्यता स्तोत्रा’चे विक्रमी समूहगायन होणार आहे. त्यासाठी १५ दिवसांपासून या उपक्रमाची पूर्वतयारी करण्यात येत आहे. गायक आनंद अत्रे आणि वादक अमोल पाळेकर यांच्यावर ही जबाबदारी संयोजक तथा नगरसेवक अजय बोरस्ते यांनी सोपवली आहे. जयोस्तुतेची संगीतमय सीडी करून ती अधिकाधिक शाळांमध्ये पोहचविण्यात आली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांची रंगीत तालीम शाळाशाळांमध्ये घेण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता ‘रेड एफएम’ वरूनही हे गीत प्रसारित करण्यात येणार आहे. त्याच वेळी सर्व शाळांमधील विद्यार्थी हे गीत गातील. अशा प्रकारचा हा एक जागतिक विक्रम ठरण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2013 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये आजपासून स्वा. सावरकर साहित्य संमेलन
ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्यातर्फे १५ ते १७ मार्च या कालावधीत येथे रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी, अभिनव भारत संस्थेपासून शोभायात्रा व ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.

First published on: 15-03-2013 at 02:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savarkar sahitya sammelan organised in nashik from today