सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यात पाच हत्तींचा वावर असूनही एका हत्तीला पकडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. तर अन्य चार हत्ती बाबतीत कोणताही निर्णय घेतला नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. मोर्ले येथे शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस याला पायदळी तुडविलेल्या हत्तीला पकडण्याचा निर्णय घेतला आहे.
दोडामार्ग तालुक्यात पाच हत्तींचा वावर आहे. मोर्ले येथे ओंकार या हत्तीने शेतकऱ्यावर हल्ला चढवून पायदळी तुडविले, त्याला पकण्याचा निर्णय घेतला आहे तर उर्वरित हत्तीचे कुटुंब दोन पिल्लासह कोलझर परिसरात आहे. आता या हत्तींनी शेतकऱ्यांना पायदळी तुडवून मारण्याची वाट सरकार,वन विभाग पाहत आहे का? असा थेट सवाल पर्यावरण प्रेमी डॉ जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.
मोर्ले येथे हत्तीच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर गावात वन विभागासह शासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधीं पोहचले. त्या सर्वांना ग्रामस्थांनी रोखून धरल्यावर तब्बल दहा तासांनी ओंकार या हत्तीला पकडण्याचा निर्णय मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी घेतला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनीची सुटका झाली.
यादरम्यान हत्तीच्या हल्यात मृत्यू पावलेल्या लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांचा धनादेश तात्काळ देण्यात आला असे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी सांगितले तर आणखी पंधरा लाख रुपये दिले जाणार आहेत. एकुण २५ लाख रुपयांची मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले. हत्ती पकड मोहीम हाती केव्हा घेतली जाणार आहे असे विचारले असता त्यांनी अजून वेळापत्रक निश्चित झाले नाही. याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.
दोडामार्ग तालुक्यात पाच हत्तींचा वावर आहे. ओंकार हत्तीला पकडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे तर मग अन्य एकत्रित असलेल्या चार जणांचे काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कळपात दोन पिल्लासह कुटुंब आहे. तेही शेती व बागायती सह लोकवस्तीत येत आहेत. त्यांच्यापासून देखील भिती वाटते आहे असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
पर्यावरण प्रेमी डॉ जयेंद्र परुळेकर व संदीप सावंत म्हणाले,काल मोर्ले येथे लक्ष्मण गवस या शेतकरी भावाचा हत्तीच्या पायदळी चिरडून जो मृत्यू झाला तो अतिशय दुर्दैवी आहे. सरकारच्या हलगर्जीपणा आणि दिरंगाई मुळे शेती बागायती मध्ये हत्तीच्या पायदळी देऊन मारण्याची ही शासन प्रशासनाची क्रुर शिक्षा आहे का? गेले काही आठवडे दोडामार्ग तालुक्यात हत्ती शिरले असल्याचे ग्रामस्थांनी वनखात्याला वारंवार कळवले होते, गेल्या दोन दशकांचा अनुभव गाठीशी असलेल्या वनखात्याने तात्काळ पाऊले उचलली असती तर कालची दुर्दैवी घटना घडलीच नसती आणि गवस यांचा जीव वाचला असता.सरकारला, वनखात्याला अजून किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत? हाच खरा प्रश्न आहे.तंत्रज्ञान एवढं प्रगत असताना आणि शेजारच्या कर्नाटक राज्यात हत्ती पकड मोहीम यशस्वीपणे राबवली जात असताना काल मोर्लेत अशी घटना घडलीच कशी? ड्रोनच्या सहाय्याने हत्तींचे लोकेशन शोधणे आता फार कठीण नाही.प्रशिक्षित हत्ती एव्हाना जिल्ह्यात आणले गेले पाहिजे होते, पण इच्छाशक्ती दुर्बल आहे.सगळा खेळ कागदी घोडे नाचवण्याचा दिसत आहे, असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.