सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला येत्या २७ जून रोजी १० वर्षे पूर्ण होत असल्याने, सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने या दिवशी रेल्वे स्थानकावर ‘वाढदिवस साजरा करत साखर वाटून गांधीगिरी’ करण्याचा निर्णय घेतला आहे. सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर यांनी याबाबत माहिती दिली.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक अॅड. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, सचिव मिहीर मठकर, संदीप टोपले,सुभाष शिरसाट, अभिमन्यू लोंढे, सागर तळवडेकर, भूषण बांदीवडेकर, हरिश्चंद्र पवार, विजया पेडणेकर, विनायक राऊळ, नारायण मसुरकर, रवी साटवलेकर, तेजस कुंभार, चंद्रशेखर मांजरेकर, आदित्य मांजरेकर, तेजस पोयेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
१० वर्षांनंतरही टर्मिनस धूळ खात:
सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले, मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे.
रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. लवकरच सावंतवाडी शहर आणि परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांची पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली.
२७ जून रोजी साखर वाटून वाढदिवस साजरा करणार
भूमिपूजनाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर एकत्र येऊन ‘टर्मिनसचा वाढदिवस’ साजरा करण्यात येणार आहे. यावेळी साखर वाटून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.