बारामती : ‘दहशतवादविरोधात जागतिक पटलावर देशाची भूमिका मांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शिष्टमंडळावर परदेशात जाऊन भूमिका मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशा आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षीय भूमिका आणू नये,’ असे सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दहशतवादाविरोधातील भूमिका जागतिक पटलावर मांडून पाकिस्तानविरोधात राजनैतिक लढाई भक्कम करण्यासाठी तयार केलेल्या खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ‘हा निर्णय पक्षीय नसतो. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना संयुक्त राष्ट्र संघामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे शिष्टमंडळ गेले होते. त्या शिष्टमंडळात सदस्य म्हणून मीही होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न येतात, तेव्हा पक्षीय भूमिका घ्यायची नसते. नरसिंह राव यांच्या काळामध्ये झाले, तेच आजही होत आहे.’
‘विमानतळ प्रश्नावर बैठक घ्या’
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे आणि स्थानिक प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात यावी. या बैठकीमध्ये येथील बागायत क्षेत्र वाचवण्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकतात का, याबाबत आढावा घ्यावा,’ अशी सूचनाही शरद पवार यांनी केली. ते म्हणाले, ‘पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारला निर्णय घ्यायचा आहे, असे पवार म्हणाले.
खासदार संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र एका शिष्टमंडळामध्ये त्यांच्या पक्षाची एक महिला सदस्यदेखील आहे. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षीय भूमिका आणू नये. – शरद पवार, ज्येष्ठ नेते