Sharad Pawar On Mumbai Local Train Accident : मुंबईजवळील दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान आज (९ जून) एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत. लोकलमधील गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत असताना ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, असं म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
“केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 9, 2025
मुंब्रा स्थानकाजवळ अपघात कसा झाला?
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी या घटनेनंतर पत्रकार परिषद घेतली. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की “कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणारी लोकल प्रवाशांनी गच्च भरली होती. काही प्रवासी फूटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते. त्याचवेळी सीएसएमटीवरून डाऊन दिशेला जाणारी एक लोकल समोरून आली. ज्या ठिकाणी या दोन्ही लोकल गाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या तिथे दोन रेल्वेरुळांमधील अंतर कमी आहे. तसेच अनेक प्रवासी दरवाजात उभे होते, त्यांच्या पाठीवर बॅगा देखील होत्या. हे प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलला घासले गेले, त्यांच्या बॅगा दुसऱ्या लोकलवर आदळल्या. त्यामुळे दरवाजात उभे असलेले आठ प्रवासी खाली पडले.”