राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक करत, त्यांची जाहीर प्रशंसा केल्याचं समोर आलं आहे. नागपुर येथे व्यापारी संघटनांकडून आयोजित करण्यात आलेल्या एक कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची देखील उपस्थिती होती.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना शरद पवार म्हणाले, “आज देशात मी संसदेत बसतो, त्या संसदेत एखाद्या राजकीय पक्षाच्या खासदाराची कोणतीही योग्य समस्या असेल, तेथील लोकांची समस्या असेल आणि ती सोडवण्याचा अधिकार कोणत्या मंत्र्याकडे असेल तर त्वरीत यामध्ये लक्ष घालून, समस्या सोडवणारे एकमेव मंत्री आहेत, ज्यांचं नाव नितीन गडकरी आहे. हे मी पाहतोय अनेकजण पाहत आहेत. एक विकासाचा दृष्टिकोन नेहमी त्यांचा असतो. विकासाला पाठिंबा देण्याची त्यांची निती असते. ते कधी पाहत नाही की हे राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत किंवा भाजपाचे किंवा आणखी कुठले आहेत. त्या भागातील समस्या ही महत्वाचं समजातात आणि ती दुरूस्त करण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. तर मला काहीना काही पावलं उचलण्याचं गरज आहे हे लक्षात घेऊन ते काम करतात. अशाचप्रकारे बाकी सर्व सहकाऱ्यांनी जर काम केलं तर मला वाटतं तुम्ही ज्या समस्या मांडल्या त्यापैकी अनेक समस्यांवर या अगोदरच तोडगा निघाला असता.”
नागपुरात व्यापारी संघटनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सर्व व्यापारींनी आपल्या अडचणी पवारांच्या समोर व्यक्त केल्या आणि पवारांना विनंती केली की त्यांनी या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे. पवारांनी बोलतांना सांगितले की, व्यापाऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी दूर होऊ शकता, त्यासाठी त्यांना एकदा मुंबईत येऊन भेटावे लागेल. पण अडचणी लगेच दूर करण्यासाठी मंत्र्याकडे जावे लागते आणि तुमच्या शहारत एक मंत्री आहे जे तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकतात ते म्हणजे नितीन गडकरी.
देवेंद्र फडणवीस सरकारवर टिप्पणी –
तसेच, व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवरून बोलताना शरद पवार यांनी फडणवीस सरकारबाबत देखील टिप्पणी केल्याचे दिसून आले. शरद पवार म्हणाले, “राज्याच संपूर्ण अधिकार, राज्य चालवण्याचा अधिकार नेहमी मुख्यमंत्र्याकडे असतो. मला देखील महाराष्ट्राच्या जनतेने चारवेळा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती. या राज्यातील सर्व विभागातील महत्वाच्या लोकांना, राजकीय नेत्यांना राज्य चालवण्याची संधी दिली गेली होती. जेव्हा राज्य चालवण्याची संधी मिळते, तेव्हा संपूर्ण राज्याची देखभाल करणं त्यांची जबाबदारी असते. परंतु, याचसोबत आपण याकडे दुर्लक्ष नाही करू शकत की ते ज्या भागातून येतात तिथे त्यांचे थोडे जास्त लक्ष असते आणि त्याचा फायदा त्या भागाला देखील मिळतो. मला वाटत होतं की, मागील पाच वर्षे विदर्भाच्या नेतृत्वाला महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली होती आणि आता तुम्ही ज्या समस्या सांगितल्या आहेत, यातील बऱ्याच समस्या तेव्हाच दूर होण्याची आवश्यकता होती. नेतृत्वात एक विकासात्मक दृष्टिकोन देखील हवा असतो. मी आनंदाने सांगतो. जेव्हा मी संसदेत बसतो, प्रफुल्ल पटेल आणि मी सोबत बसतो. अनेक समस्या येतात सरकारशी भांडण देखील होतं. आम्ही वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रात काम करतो. सरकार एका वेगळ्या विचाराचे तिथे बसलेले आहे, मात्र या सरकारमध्ये काहीजण असे आहेत की जे नेहमीच संपूर्ण देशाचे संरक्षण कसे होईल, यावर लक्ष देतात. प्रादेशिक मुद्दा कधी त्यांच्या मनात येत नाही.”
प्रादेशिक असमतोल दुरूस्त करण्याची आवश्यकता –
याचबरोबर, “आम्ही सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक साखर कारखाने उभे केले. मी पाहतो जेव्हा दिवाळी येते, दिवाळीच्या अगोदर आमचे साखर कारखाने शेतकऱ्यांना ऊसाची किंमत देण्याचा जो पहिला हप्ता आहे तो देतात आणि जेव्हा त्यांच्या हातात पहिला हप्ता येतो. तेव्हा बाजारपेठेते एक वेगळ्याप्रकारचं वातावरण पाहायला मिळतं. कारण, लोकांची खरेदी करण्याची ताकद वाढते आणि जेव्हा ताकद वाढते तेव्हा विकास होऊ शकतो. यामुळे देश चालवणाऱ्याचे कर्तव्य आहे की अर्थव्यवस्था कशी मजबुत करता येईल. कृषी क्षेत्र कसं मजबुत करावं, उद्योग क्षेत्र कसं मजुबत करावं आणि व्यापारात कधी वाढ केली जाईल. त्यामुळे आम्ही असं मानतो की ज्या राज्यांमध्ये या क्षेत्रात चांगलं काम झालं आहे, त्यामध्ये नेहमीच महाराष्ट्राच नाव येतं. मात्र मला हे सांगावं वाटतं की यामध्ये प्रादेशिक असमतोल पाहायला मिळतो आणि प्रादेशिक असमोतल जर आपण दुरूस्त नाही करू शकत, तोपर्यंत अर्थव्यवस्थेला, सर्व विभागांना, जिल्ह्यांना याचा लाभ मिळू शकत नाही.”
“सत्तेचा वापर कसा करायचा हे नितीन गडकरी….”; शरद पवार यांचं वक्तव्य
या अगोदर देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल मोठं विधान केलं होतं. राज्यात विरोधी पक्षात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी केलेल्या विकासांच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं होतं. इतकंच नाही तर सत्तेचा वापर विकासाच्या कामांसाठी कसा करावा हे नितीन गडकरी यांच्याकडून शिकलं पाहिजे, अशा शब्दांत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते.