जळगाव : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आणखी १५ ते १६ टक्क्यांनी वाढविल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल. यासंदर्भात केंद्र सरकारने संसदेत दुरुस्ती करण्याची गरज आहे, असा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचविला आहे. ओबीसी समाजासाठी असलेल्या आरक्षण कोटय़ात आणखी वाटेकरी करणे, हे योग्य नसल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही पवार यांनी सांगितले. शरद पवार हे मंगळवारी जळगाव येथे जाहीर सभेसाठी आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जालना जिल्ह्यातील सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले, का दिले गेले, त्याची गरज होती का, या प्रश्नांचे स्पष्टीकरण सरकारनेच द्यावे. कारण, यंत्रणा त्यांच्या हातात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली म्हणजे लाठीमार कोणी केला, याबाबतची थोडी तरी स्पष्टता झाली आहे. आता फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा की नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे, असे पवार यांनी सांगितले. पावसाअभावी राज्यातील बहुतांश भागांमध्ये दुष्काळाचे सावट असल्याने राज्य सरकारने याबाबत उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.पत्रकार परिषदेनंतर आयोजित जाहीर सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ पक्ष फोडाफोडीचे काम केल्याची टीका केली. हेही वाचा >>>“मी जगलो तर तुमचा, अन् मेलो तर…”, मनोज जरांगे पाटलांचा मराठा आंदोलकांना संदेश इंडिया हटविणे अशक्य केंद्र सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलाविले आहे. अधिवेशनात केंद्र सरकार ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर शरद पवार यांनी भाष्य केले. ‘इंडिया’ नाव हटविण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे त्यांनी ठणकावले. मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांची बुधवारी बैठक बोलावली आहे. बैठकीत याबाबत विचार होईल. सत्ताधाऱ्यांना देशाशी निगडित असलेल्या नावाची एवढी अस्वस्थता का वाटत आहे, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.