सातारा : प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी भाषेची सक्ती नको. इयत्ता ५ वीपर्यंत सरकारने हिंदीचा हट्ट सोडावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. तसेच या प्रश्नावर ठाकरे बंधूंनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे सांगितले.
पवार म्हणाले, हिंदी भाषेची सक्ती नको. कोणतीही भाषा प्रवाही असते. मात्र त्या संदर्भातले निर्णय ऐच्छिक असावेत. प्राथमिक शिक्षणामध्ये त्याची सक्ती केली जाऊ नये, असेही ते म्हणाले. मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील हे सांगणे व्यक्तिसापेक्ष आहे. हिंदी सक्तीपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ताही मुलांसाठी महत्त्वाची आहे. त्याचे शिक्षण मुलांना मिळावे. त्यासंदर्भात विशिष्ट प्रक्रिया विकसित करणे याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी संदर्भात बोलताना पवार म्हणाले, याबाबत आघाडीतील तिन्ही घटक पक्षांची एक प्राथमिक बैठक झाली आहे. या निवडणुका महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील. काही ठिकाणी स्थानिक राजकीय समीकरणे पाहून निर्णय घेऊ. शक्तिपीठ मार्गाला सांगली व कोल्हापूर येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात पवार म्हणाले, की हा प्रकल्प काय आहे, तो मला समजून घ्यायचा आहे. इराण-इस्राइल संघर्षामध्ये भारताला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, असेही ते या वेळी म्हणाले.