राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्ष पदावरून पायउतार झाले आहेत. त्यांनी ‘लोक माझा सांगाती’ या आपल्या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात अचानक आपली निवृत्ती जाहीर केली. शरद पवारांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी वाय बी सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले, “राजीनामा देण्याआधी मी तुमच्याशी चर्चा केली असती, तर मला खात्री होती की तुम्ही मला होय म्हणाले नसता. हा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राज्याबाहेरील लोकांबरोबर उद्या बैठक होईल. त्यानंतर एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय सांगू. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही” असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

हेही वाचा- अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत दोन गट पडले? जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

वाय बी सेंटरबाहेर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “असा निर्णय घेण्याआधी सहकार्यांशी चर्चा करणं आवश्यक असतं, पण मला खात्री होती, तुम्ही मला ‘होय’ म्हणाले नसता. तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची आवश्यकता होती, पण त्यावेळी मी तुम्हाला विश्वासात घेतलं नाही. त्यामागे माझा हेतू काय होता? हे मी तुम्हाला सांगितलं आहे.”

हेही वाचा- “शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले आणि अजित पवारांना…”, राजीनामानाट्यावर रामदास कदमांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राबाहेरून तुमचे अनेक सहकारी इथे आले आहेत. उद्या माझ्याशी त्यांना बोलायचंय. उद्या संध्याकाळपर्यंत माझी त्यांच्याबरोबर बैठक होईल. त्यानंतर तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरून आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन… येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम भूमिका घेऊ. पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, एवढंच याठिकाणी सांगतो. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, याची खात्री देतो,” असंही शरद पवार यावेळी म्हणाले.