सातारा : सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीला पाकिस्तानच्या कारवाया जबाबदार आहेत. दहशतवाद्यांना पोसण्यापासून ते त्यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहण्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आलेला आहे. अशा वेळी त्यांच्याकडून हल्ले होत असतील तर त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. ते काम केंद्र सरकार करत असून या वेळी सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
सातारा येथे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी कार्यकारी मंडळाचे सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
पवार म्हणाले, की भारत हा कधीच दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही. आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत. हा दहशतवाद पाकिस्तानमुळे सुरू झाला आहे. त्यांच्यामुळेच आपल्यावर हल्ले होत आहेत. अशा वेळी आपल्या रक्षणाची खबरदारी आणि त्यासाठी काही निर्णय हे घ्यावेच लागतात. जगातील मोठ्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत जर पाकिस्तानी सरकारचे प्रतिनिधी सहभागी होत असतील तर त्यातून जगाला त्या देशाचा खरा चेहरा नक्कीच समजत आहे. पाकिस्तानच्या या बेजबाबदार वागण्यामुळे आजची स्थिती निर्माण झाली आहे.