Eknath Shinde At 59th Shiv Sena Foundation Day: मुंबईतील वरळीत शिवसेनेचा (शिंदे गट) ५९ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “बाळासाहेब म्हणायचे की, मला एक दिवस पंतप्रधान करा; मी अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आणि जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचे काम करेन.”
या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अयोध्येतील राम मंदिर आणि जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० यांचा समावेश होता.
हिंदुत्वाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “देशद्रोह्यांची देशभक्तांशी तुलना करणे हे तुमचे हिंदुत्व आहे का? ‘हनुमान चालीसा’ म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकले, हे तुमचे हिंदुत्व होते का? बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवावे. बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, ही दोन्ही कामे मी करेन. ही दोन्ही कामे कोणी केली? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केली. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवले, त्या काँग्रेसच्या नावाने ओव्या गाता! हे कसले हिंदुत्व आहे?”
दरम्यान, षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाचाही वर्धापन दिन पार पडला. या कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दंगली, बाळासाहेब ठाकरे आणि नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील ‘कम ऑन, किल मी’ या संवादाचा उल्लेख केला होता.
उद्धव ठाकरे यांच्या या टिप्पणीला नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “ते ‘कम ऑन, किल मी’ असे म्हणाले. इंग्रजी चित्रपट पाहून आले असतील, असे वाटते. पण मला एकच सांगायचं आहे, मेलेल्याला काय मारायचे? महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलेला आहे.”