शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला. या वर्धापन दिनाचे दोन मेळावे झाले. एक उद्धव ठाकरेंचा तर दुसरा एकनाथ शिंदेंचा. वरळीतल्या डोम सभागृहात एकनाथ शिंदेंनी मेळावा घेतला. तर षण्मुखानंद हॉल या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर, भाजपावर जोरदार निशाणा साधला. तर एकनाथ शिंदेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं.

उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना आव्हान

पक्ष फोडायचे, सरकार पाडायचं, फोडलेल्या लोकांना मंत्रिपदं द्यायची हा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे. आज मी मिंधे आणि भाजपाला आव्हान देतोय जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं चिन्ह न चोरता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. नाहीतर षंढ म्हणून फिरा, विजेते म्हणून फिरु नका. मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो वापरला दुसऱ्या कुणाचाही फोटो वापरला नाही.

एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर

“आज काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला. तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखलं. आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता. हे आपण निवडणुकीमध्ये पाहिलं. जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी देतो. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…. आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली”, असं जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं. मात्र याच मेळाव्यात रामदास कदम यांनी देवेंद्र फडणवीसांना घरचा आहेर दिला आहे. तोदेखील अजित पवारांच्या महायुतीत येणाऱ्यावरुन.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला, “पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे आता गाणं गात आहेत, मला जाऊ द्या ना घरी..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले रामदास कदम?

अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या आमदारांना मंत्रिपदापासून दूर रहावं लागलं. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार थोडे दिवस नसते आले तरीही चाललं असतं. असं रामदास कदम फडणवीसांना उद्देशून म्हणाले. तसंच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. मात्र अजित पवार महायुतीत आल्याने महायुतीतली नाराजी त्यांनी अशा पद्धतीने बोलून दाखवली आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच दस्तुरखुद्द अजित पवार यावर काय बोलणार? हे पाहणंही महत्त्वाचं असेल. रामदास कदम यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरेंवरही टीका केली. शिवसेना ही उद्धव ठाकरेंना त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाटते आणि शिवसैनिक त्यांचा गुलाम आहे असं वाटतं असं रामदास कदम म्हणाले.