Shivsena Split २०२२ ला शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं ते शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड ठरलं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत तर शिवसेना घेऊनच बाजूला झाले आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या साथ घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याची बाब एकनाथ शिंदेंना खटकली होती. अडीच वर्षांनी शिवसेना बरोबर घेऊन एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्यांना साथ लाभली ती ४० आमदारांची. शिवसेनेतलं हे सर्वात मोठं बंड ठरलं. आता भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरे होत्या असा दावा केला आहे.
रश्मी ठाकरेंवर थेट आरोप कुणी केला आहे?
शिवसेनेत पडद्यामागून रश्मी वहिनींचा हस्तक्षेप बराच होता. उद्धव ठाकरेंच्या मनात काही गोष्ट होत्या, पण नंतर बदल व्हायचे. आम्ही मातोश्रीवर किंवा वर्षावर जायचो तेव्हा आम्हाला भेट मिळत नव्हती. शिवसेना फुटण्याची अनेक कारणं आहेत. पण वहिनींचा हस्तक्षेप होता हे पण एक कारण आहे. जे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना जर तुम्ही (उद्धव ठाकरे) बाजूला ठेवणार असाल तर ही गोष्ट घडणारच ना असंही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंना परत शिवसेनेत यायचं होतं-गोगावले
नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना शिवसेनेत परत यायचं होतं. नारायण राणेंचे काही मित्र आणि आमच्या काही चर्चा होत होत्या. आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की नारायण राणे येत असतील तर त्यांना घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणात लोकांना खूप मदत केली. आमचं, अनेक शिवसैनिकांचं म्हणणं होतं की नारायण राणेंनी शिवसेनेत आलं पाहिजे. पण कुठे काय माशी शिंकली माहीत नाही. राज ठाकरेही उद्धव ठाकरे आजारी झाले तेव्हा गाडी चालवत मातोश्रीवर आले होते. आम्हाला तेव्हाच वाटलं होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील. पण तेव्हा तेदेखील झालं नाही. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना दाखवायची असेल तर आपल्याला एकत्र यायचं असेल तर एकनाथ शिंदेंसह जाणं आवश्यक आहे हे आम्हाला पटलं, त्यामुळेच आम्ही शिवसेना घेऊन पुढे आलो असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून प्रमोद नवलकर, नारायण राणे, सुधीर जोशी, मनोहर जोशी या सगळ्या दिग्गजांनी काम केलं होतं. ज्यावेळी संघटना इतकी मोठी नव्हती तेव्हा ताकदीने शिवसेना उभी केली. त्या मंडळींना पुन्हा जवळ केलं असतं तर काय चुकीचं होतं? असाही प्रश्न भरत गोगावलेंनी विचारला आहे.
आम्ही एकनाथ शिंदेंच्या बाजूने आहोत, शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य-गोगावले
राजकारण हे कधी कुठे वळण घेईल हे सांगू शकत नाही. जिंकणारा संघ हरतो, हरणारा संघ जिंकतो. पण आमचा संपूर्ण विश्वास हा एकनाथ शिंदेंवर आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. भाजपाचं आणि आमचं ट्युनिंग जुळलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचं तत्त्व होतं की काहीही झालं तरीही हिंदुत्व सोडायचं नाही. एकनाथ शिंदेंनी तेच तत्त्व पाळलं आहे असंही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. भरत गोगावले यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.