कराड : भारतीय सैन्यदलातील सहकाऱ्यांवरील ठाम विश्वास, संयम, धैर्य आणि युक्ती यांच्या बळावरच भारतीय जवानांनी १३ एप्रिल १९८४ रोजी सियाचीनवर ताबा मिळवला, असे माजी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी सांगितले. सैनिकाचे आयुष्य हे फक्त रणांगणापुरते मर्यादित नसते; तर प्रत्येक क्षणी देशाचे रक्षण करण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.

येथील जनकल्याण प्रतिष्ठान व श्री रेफ्रिजरेशन्स यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सियाचीनची विजयगाथा’ या देशभक्तीपर प्रेरणादायी कार्यक्रमात भारतीय सैन्यदलाचे निवृत्त लेफ्टनंट जनरल, माजी महासंचालक व ‘सियाचीनचे नायक’ म्हणून गौरवले गेलेले संजय कुलकर्णी यांनी सियाचीन ग्लेशिअरवर नियंत्रण मिळवण्यासाठी झालेल्या ‘ऑपरेशन मेघदूत’मधील आपल्या थरारक अनुभवकथनाने उपस्थित कराडकर नागरिक व सरस्वती विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना रोमांचित करून टाकले. संजय कुलकर्णी यांना शौर्य पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक यांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सन १९८४ मध्ये हिमालयातील गगनभेदी उंचीवरील सियाचीन ग्लेशिअरवर भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी मोहिमेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले संजय कुलकर्णी यांनी प्रतिकूल हवामान, उणे तापमान, मृत्यूशी झुंज, हेलिकॉप्टरच्या मर्यादा, सतत बदलणारे वातावरण आणि शिस्तबद्ध नियोजन या सर्वांचा थरारक पट त्यांच्या शब्दांत उलगडला. सैनिकाचे आयुष्य हे फक्त रणांगणापुरते मर्यादित नसते तर, प्रत्येक क्षणी देशाचे रक्षण करण्याचा संकल्प असतो,” असे सांगत त्यांनी उपस्थित तरुणांना प्रेरित केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री रेफ्रिजरेशन्सचे अध्यक्ष रवळनाथ शेंडे यांनी, प्रत्येक भारतीयाला आपल्या सैनिकांचा अभिमान आहे. अशा कार्यक्रमांमुळे तरुणाईसमोर जिवंत आदर्श उभा राहतो, असे मत व्यक्त केले. तर जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सीए. शिरीष गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. प्रारंभी, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतमाता पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शिरीष गोडबोले व रवळनाथ शेंडे यांच्या हस्ते करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय रुपाली तोडकर यांनी करून दिला. सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला कराडकर नागरिक, जनकल्याण प्रतिष्ठानचे संचालक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.