साताऱ्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसपूस पुन्हा एकदा समोर आली आहे. सातारा जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये जावळी सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे हे पराभूत झाले आहेत. शिंदे अवघ्या एका मताने पराभूत झाल्याने त्यांच्या समर्थकांनी संतापाच्या भरामध्ये आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी लक्ष घातले आहे.

अजित पवार रायगड दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत माहिती मिळाली. यावेळी त्यांना साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीसंदर्भात ताबडतोब साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याशी चर्चा केली.  

अजित पवार म्हणाले, “पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पाच-सहा लोक होते. त्यांना आम्ही ताब्यात घेतले. ते कोण होते त्याची चौकशी पोलीस करत आहेत. कोणत्याही निवडणुकीत यश अपयश असते. सगळेच निवडणून येतात असे नाही. सहकार क्षेत्रातील निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. साताऱ्यात जे पॅनल झाले होते. त्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक होते. त्यात अनेक आमदार, खासदार होते. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवली जात नाही. संस्था चांगली चालावी आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी त्या भावनेतून ती बॅंक चाललेली आहे. दोन्हीकडील उमेदवार हे पक्षाचे असले तरी निवडणुकीत जय पराजय हा होतच असतो.” 

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे यांना अडचणीत आणलं

शिकांत शिंदेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आलेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून ज्यांनी शशिकांत शिंदेंविरोधात या निवडणुकीमध्ये कट रचला, त्याचा निषेध म्हणून आम्ही राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली, असं दगडफेक करणाऱ्या शिंदे समर्थकांनी सांगितलं आहे. आम्ही सर्व राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. आज फक्त एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल्यात आल्याने आम्ही दगडफेक करुन निषेध करत आहोत, असंही या कार्यकर्त्यांनी सांगितलं.

शशिकांत शिंदे यांचा पराभव हा जाणीवपूर्वक पद्धतीने घडवून आणल्याने आम्ही त्याचा निषेध करतो. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांना जाणीवपूर्वक पद्धतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गाफील ठेवलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सूचना करुनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे यांना अडचणीत आणलं. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवणारा एकमेव नेता आहे. जिल्हाभर फिरुन राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचं काम त्यांनी केलंय. पण काही लोकांना हे रुचत नव्हतं की शशिकांत शिंदे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं नेतृत्व बनू पाहत आहेत. त्यामुळेच जाणीवपूर्वक हा पराभव घडवून आणल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला आहे.