अलिबाग: किल्ले रायगडावर ६ जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून दिड लाख शिवभक्त गडावर दाखल होण्याचा शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने शिवभक्तांच्या जेवणासाठी पाच हजार किलो तांदुळ आणि १ लाख पाण्याचा बाटल्या उपलब्ध करून दिला आहे. गडावर १५ बेडचे रुग्णालय तर पाचाड येथे पाच बेडचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.

दरवर्षी रायगड किल्ल्यावर तारिख आणि तिथी नुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यावर्षी तारखेनुसार ६ जून रोजी तर तिथी नूसार ९ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने राज्यभरातील लाखो शिवभक्त रायगड किल्ल्यावर दाखल होणार आहे. संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी एक लाख शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. तर ९ जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ५० हजार शिवभक्त हजेरी लावणे अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. रायगड किल्ला आणि पाचाड परिसरात पावणे दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव दल आणि दंगल नियंत्रण पथकांना पाचारण करण्यात आले आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पाचाड येथे दिडशे तर गडावर दिडशे पोर्टेबल स्वच्छतागृह बसविण्यात आले आहेत. पायरी मार्गावर ५०० लीटरच्या ५० पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत.

५ जलशुध्दीकरण यंत्रातून या टाक्यांना पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय १ लाख लीटर पाण्यांच्या बाटल्या प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या जेवणासाठी ५ हजार किलो तांदुळ आणि अन्न शिजवण्यासाठी लागणारी इतर सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. ६ जूनला दिड लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था तर ९ जूनसाठी ५० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था ही प्रशासनाकडून केली जाणार आहे.

गडावर १५ बेडचे रुग्णालय, गडावर चार तात्पुरते दवाखाने, पायरी मार्गावर १५ तात्पुरते दवाखाने, महाड आणि माणगाव येथे बेड आरक्षित ठेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. १२ वाहन तळांची उभारणी केली आहे. पाचाड येथील वाहनतळापासून पायरी मार्गापर्यंत प्रवाश्यांची ने आण करण्यासाठी १०० एसटीच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गर्दी व्यवस्थापनासाठी १७ ठिकाणी उद्घोषणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पाचाड येथील नागरिकांना पाहता यावा यासाठी शासनाकडून ७ स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. शिवभक्तांच्या सोयीसाठी २२ ठिकाणी मंडप लावण्यात आले आहेत. बंगळूरू येथील चेंगरा चेंगरीची घटना लक्षात घेतली तर रायगड किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांच्या गर्दीचे व्यवस्थापन हे प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.