उस्मानाबाद तालुक्यातील आकुबाई पाडूळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या जिल्हा परिषद गटातील विवीध विकासकामांचे लोकार्पण व कार्यकर्ता मेळावा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या मेळाव्यात भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे यांनी यावेळी ईडीच्या कारवायांवरून देखील टोला लगावला. “ईडी पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त आहे.”, असं त्यांनी बोलून दाखवलं.

भाजपाचा आणखीही अंगातला माज गेलेला नाही –

धनंजय मुंडे भाषणात म्हणाले, “आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत, आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. भाजपाचा आणखीही अंगातला माज गेलेला नाही. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं केलं तरी. भल्या भल्याच्या मागे इनकम टॅक्स काय, सीबीआय काय… ईडी ची तर इज्ज एवढी पण ठेवली नाही … अरे त्या ईडी पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त आहे. एवढ्यावरही त्यांना वाटतं की आम्ही कुणाला झुकवू शकतो, वाकवू शकतो, पुन्हा या महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकतो. त्यांची खरी जर जिरवायची असेल, तर येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष आहे हे आपण दाखवलं, तर भाजपावाले या महाराष्ट्राच्या मातीत कधीही अशा पद्धतीचा नाद करणार नाहीत. हा विश्वास मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करावा वाटतो.”

तसेच, “निकाल लागल्यानंतर ज्याला वाटत होतं, होतं त्याचं कधी नव्हतं झालं कळालच नाही. पण जगाला खऱ्या लोकशाहीचं दर्शन, लोकशाही काय असते, लोक मानस काय असतो याचं दर्शन जर खरं कुणी घडवून दाखवलं असेल तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी घडवून दाखवलं.” असं धनंजय मुंडे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याला म्हणतात होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं –

“चमत्कार काय झाला ६४ आमदार असलेले राज्याचे मुख्यमंत्री झाले, ५४ आमदारांचे उपमुख्यमंत्री झाले, ४४ आमदार असलेल्यांचे मंत्री झाले आणि १०५ आमदार असलेले विरोधी पक्षात बसले. याला म्हणतात होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं. आज राजकीय परिस्थिती आपल्या सर्वांच्या समोर आहे. आगामी काळात जिल्हापरिषद, पंचाय समिती, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आज सांगायला अभिमान वाटतो की काल-परवा झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्राची संबंध आकडेवारी पाहीली तर त्यामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष नगरपंचायतीचे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले आहेत.” असंही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलून दाखवलं.