राज्यातील ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजेपासून सुरु झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले असून, बहुतांश ठिकाणी भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. विशेष करून शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात भाजपाच्या वाट्याला मोठं यश आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी खास प्रतिक्रिया देखील दिली आहे.

“देवगड २३ पैकी १८, वैभववाडी १२ पैकी ९, कणकवली ३ पैकी १, मालवण ६ पैकी ५, कुडाळ ८ पैकी ४ ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. तरी देखील सिंधुदुर्गात भाजपा पिछाडीवर म्हणत असाल, तर भाजपा पिछाडीवरच अशीच पिछाडी कायम राहू दे!” असं ट्विट करत नितेश राणे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

तर, “राणेंना धक्का देणारा अजुन जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार. सिंधुदुर्गातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व.” असं या अगोदर ट्विट करून नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली होती.

तसेच, भाजपाच्या पत्रकारपरिषदेत बोलताना केवश उपाध्ये यांनी देखील कोकणातील जनतेने भाजपाला ग्रामपंचायत निवडणुकी भरभरून मतदान केलं असल्याचं सांगितलं आहे.

Gram Panchayat Results: “राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि…”; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

“असं म्हटलं जात कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणात शिवसेने शिवाय कुणी दुसरं येत नाही. पण या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला हा समज कोकणाने थोटा ठरवला व भाजपाला भरभरून मतदान दिलं.” असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं. तसेच, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी तळेगाव ग्रामपंचायत दत्तक घेतली होती, ही ग्रामपंचायत देखील भाजपाने जिंकली असल्याचीही उपाध्येंनी यावेळी माहिती दिली.

शिवसेनेचा बालेकिल्ला हा समज कोकणाने खोटा ठरवला – केशव उपाध्ये

भाजपाकडून कणकवलीची परतफेड –
कोकणामधील कणकवली तालुक्यात शिवसेनेने भाजपाला म्हणजेच राणे कुटुंबाला धक्का दिला असला तरी दुसरीकडे मालवणमध्ये भाजपाने त्याची परफेड केली आहे. मालवणमधील सहापैकी पाच ग्रामपंचायतींवर कमळ फुललं आहे. मलावणमधील हा पराभव शिवसेनेबरोबरच स्थानिक शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.