SC on Maharashtra Satta Sangharsh Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर येत्या काही मिनिटांतच फैसला होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच नेत्यांची धाकधुक वाढली आहे. गेल्या १० महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या सुनावणीत न्यायालयाने दोहोंच्या बाजू ऐकून घेतल्या आहेत. आज याप्रकरणी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सरकार राहील की जाईल, १६ आमदार अपात्र ठरतील की तो निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे जाईल, उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्तावावर आज निर्णय होणार आहे. त्याआधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
सरकारला धोका नाही, असं अजित पवार काल (१० मे) म्हणाले होते. यावरून पत्रकारांनी आज संजय राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “अजित पवारांचं ते मत असेल. त्यांचं मत असू शकतं. ते विरोधी पक्षनेता आहेत. ते विधानसभेत विरोधी पक्षनेता आहे. मी महाविकास आघाडीत असेल, पण शिवसेनेचा (ठाकरे गट) खासदार आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत. १६ आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री अपात्र ठरतात. त्यामुळे उर्वरित २४ आमदारही अपात्र ठरतील. त्यामुळे हे सरकार क्षणभरही राहणार नाही, सरकार जाईल, अशी ग्वाही आम्ही जनतेला देऊ इच्छितो. आम्ही महाविकास आघाडीसंदर्भात अत्यंत आशावादी आहोत.” आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मूर्खांना कंट्रोल करावं
“निर्णयाआधी निकाल काय लागेल यावर भाष्य करणे हे मुर्खपणाचे आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर अशा मुर्ख लोकांना फडणवीसांना कंट्रोल केलं पाहिजे”, असंही संजय राऊत म्हणाले.
आज फैसला होणार
“सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या लोकशाहीची हत्या करणार नाही. आजचा फैसला स्पष्ट करेल की या देशात लोकशाही, स्वातंत्र्य आणि संसद, विधानसभा आणि न्यायालय आहे की नाही”, असंही ते म्हणाले.