सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गानजीक टेंभुर्णीजवळील अकलूज रस्त्यावर दोन दुचाकी गाड्यांची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.ओंकार बाबासाहेब शिंदे (वय १८) व निखिल वंजारे (वय २०, दोघे रा. करकंब, ता. पंढरपूर) आणि प्रशांत खडतरे (वय २२, रा. अकलूज, ता. माळशिरस) अशी या अपघातातील तिन्ही मृत तरुणांची नावे आहेत. जखमींमध्ये सूरज अरुण लोखंडे (वय १८, रा. उपरी, ता. पंढरपूर) आणि दयानंद बंटी जाधव (वय २२, रा. अकलूज) यांचा समावेश आहे.
यातील मृत खडतरे याचा वाढदिवस होता. तसेच त्याच्या भावाचे लग्नही असल्यामुळे लग्नाच्या आमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी तो मित्रांसह दुचाकीवर सोलापूरला गेला होता. तेथून गावाकडे परतताना वाटेत त्याच्यासह अन्य दोघा मित्रांना मृत्यूने गाठले. वाढदिवस आणि भावाच्या लग्नसोहळ्याची तयारी सुरू असतानाच त्याला काळाने झडप घालून हिरावून घेतल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशांत खडतरे, सूरज लोखंडे आणि दयानंद जाधव असे तिघेजण दुचाकीवर बसून प्रवास करीत होते. सोलापूरपासून ८० किलोमीटर अंतर कापून टेंभुर्णी येथे आले आणि तेथून अकलूजच्या दिशेने जात असताना वाटेत टेंभुर्णीपासून सात किलोमीटर अंतरावर मस्के वस्तीजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात घडला. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या घटनेची माहिती दिली असून, पुढील तपास ते स्वतः करीत आहेत.