रत्नागिरी – रत्नागिरी जवळच असणा-या आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या रत्नागिरीतील चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. यात तीन मुली व एका तरुणाचा समावेश आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथील हे चौघे असल्याचे सांगितले जात आहे. बुडालेल्या चार पर्यटकांपैकी तीन पर्यटक महिला तर एक पुरुष आहे.
रत्नागिरी आरेवारे व इतर ठिकाणी असलेल्या समुद्रकिनार भागात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या समुद्र किनारी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी पहावयास मिळते. अशाप्रकारे शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ओसवाल नगर येथून आरे वारे समुद्र येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक बुडाल्याची घटना घडली. यामध्ये जुनेद बशीर काझी ( वय ३०, ओसवाल नगर), जैनब जुनेद काझी (वय २८, ओसवाल नगर) उजमा समशुद्दीन शेख ( वय १७, मुंबई मुंब्रा) उमेरा शमशुद्धीन शेख (वय १६, रा. मुंब्रा) अशी नावे आहेत. बुडालेल्या चार पर्यटकांमधील दोन पर्यटक हे नुकतेच मुंबई येथून रत्नागिरीत नातेवाईकांकडे आले होते. अंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जण पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील आदेश कदम यांनी ग्रामीण पोलीसांना दिली. पोलिसांकडून घटनास्थळाला भेट देवून चौघांचेही मृतदेह स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती.