जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्याने ४ सप्टेंबर रोजी बंद पुकारण्यात आला आहे. तसंच, संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागाकडून पुणे, अहमदनगर, बीड, जालना, पैठण मार्गावरील बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कन्नड, सिल्लोड मार्गावरील बसची प्रवासी वाहतूक अंतरिम सुरू ठेवली आहे. परिणामी याचा फटका तलाठी परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे उद्याची (४ सप्टेंबर) तलाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी शुक्रवारी आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या निषेधार्थ जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. त्याला हिंसक वळण लागले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या आणि रबरी गोळ्याही झाडल्या. जमावाच्या दगडफेकीत एका वाहनाच्या काचा फुटल्या, तर आंदोलकांनी एका मालवाहू वाहनास आग लावली. दगडफेकीत जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह काही पोलीस जखमी झाले.
हेही वाचा >> जालना लाठीमारानंतर पुणे-नगर, बीड-जालना, पैठण मार्गावरील बसच्या फेऱ्या रद्द
या हिंसाचारप्रकरणाचा निषेध करण्याकरता उद्या बंदची हाक देण्यात आली आहे. परंतु, यामुळे तलाठी परिक्षेच्या उमेदवारांना फटका बसणार आहे. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. “जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या सोमवार, ४ सप्टेंबर २०२३ रोजी बंद पुकारण्यात आला आहे. नेमक्या याच दिवशी राज्यभरात तलाठी भरती परीक्षा नियोजित आहे. हजारो विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र मिळाले आहे. उद्याच्या बंदमुळे एसटी सेवा व इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता असून, तलाठी भरती परीक्षेच्या उमेदवारांची गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने उद्याची परीक्षा तातडीने पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून समोर येते आहे. याबाबत शासनाकडून तातडीने कार्यवाही अपेक्षित आहे”, असं ट्वीट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
जालना लाठीमारप्रकरणी पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे. उच्चस्तरीय चौकशीनंतर निलंबनाची कारवाई केली जाईल. या प्रकरणी प्रसंगी न्यायिक चौकशीही करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.