Uddhav Thackeray on Maharashtra Election Commission : महाविकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी काही वेळापूर्वी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळ निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यादीमधील चुका दुरुस्त करून पारदर्शकपणे निवडणुका घेण्याचं आवाहन केलं. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पटल्यानंतर मविआ व मनसे नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, सर्व नेत्यांनी कोणकोणते प्रश्न उपस्थित केले, त्यावर निवडणूक आयोगाने काय उत्तरं दिली याबाबतची माहिती दिली.
दरम्यान, पत्रकार परिषदेत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला निष्पक्षपणे, पारदर्शकपणे निवडणुका घ्यायच्या असतील तरच या निवडणुका घ्या अन्यथा तुम्ही इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा.”
मतदार याद्यांमधील घोळ आयोगाच्या निदर्शनास आणून दिला : उद्धव ठाकरे
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख म्हणाले, “लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टीला देखील पत्र पाठवलं होतं की तुम्ही देखील या चर्चेला. परंतु, ते काही आले नाहीत. काल झालेल्या बैठकीला आणि आजच्या बैठकीला भाजपाकडून कोणीही आलं नाही. काल व आजच्या बैठकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचं आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं.
“मागील विधानसभा निवडणुकीवेळी या गोष्टी लक्षात आल्या होत्या. यासंदर्भात १९ ऑक्टोबर रोजी म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की काही भाजपा कार्यकर्ते मतदारयादीशी खेळतायत. त्यांना वाटेल त्या व्यक्तीला ते मतदार यादीत घुसवतायत, त्यांना वाटेल त्या व्यक्तीचं नाव यादीतून वगळलं जात आहे.”
…तर निवडणुका घेऊच नका : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, “एकाच घरात २०० ते ४०० लोक राहात असल्याचं यादीत पाहायला मिळालं. या लोकांनी लोकशाहीचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की निष्पक्ष निवडणुका घ्यायच्या असतील तरच घ्या. नाहीतरी इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा.”