महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका मुलाखती दरम्यान उद्धव ठाकरे हे संताप्रमाणे आहेत मात्र त्यांच्याभोवती शकुनीमामा आणि इतर चांडाळ चौकडी आहे त्यामुळे त्यांचं नुकसान होतं आहे असं वक्तव्य केलं. ज्याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावत उत्तर दिलं आहे. भगतसिंह कोश्यारी गेले, गेलेल्या माणसांबाबत वाईट बोलू नये असं म्हणत हसत हसत खोचक उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आता त्यांच्या राज्यात गेले आहेत. जे गेले त्यांच्याबाबत वाईट बोलू नये. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखात जावं या मी त्यांना शुभेच्छा देतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळी महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातून विस्तव जात नव्हता. त्याचप्रमाणे आपल्या विविध वक्तव्यांमुळेही भगतसिंह कोश्यारी हे कायमच वादात अडकले. त्यांनी राजीनामा देण्याची इच्छाही व्यक्त केली होती. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एक मुलाखत दिली त्यात त्यांनी उद्धव ठाकरे खूप चांगले आहेत असं म्हटलं होतं. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मात्र खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जेव्हा या वादाला सुरुवात झाली, तेव्हा निवडणूक आयोगानं आम्हाला प्रतिज्ञापत्रं सादर करायला लावली होती. सदस्य संख्या दाखवा, असं सांगितलं होतं. मग मधल्या काळात चार-सहा महिने गेले. दरम्यान, शिवसेनेनं बोगस प्रतिज्ञापत्रं दिली अशा बातम्या आल्या. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी जाऊन शपथपत्रे तपासली. त्यामध्ये असत्य असं काहीच नाही, सर्व कागदपत्रे योग्य आहेत, असा अहवाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक आयोगानं सांगितलेल्या फॉरमॅटनुसार आम्ही शपथपत्रे दाखल केली. पाऊस पडत असताना आम्ही सुरक्षित पद्धतीने सर्व प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे नेऊन दिली. आमच्याकडे रद्दी वाढली होती, म्हणून आम्ही ही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे दिली नव्हती. निवडणूक आयोगानेच आम्हाला सांगितलं होतं की, तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र सादर करावी लागतील. तसेच सदस्य संख्या दाखवावी लागेल. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रं जमा केली असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.