सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासह सह्याद्री घाटमाथ्यावर सीमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरण मंगळवारी सकाळी नऊ वाजता मृत पातळीतून उपयुक्त पातळीत आले. अवघ्या आठवडाभरात धरणात सुमारे १७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उन्हाळ्यात मे महिन्यात धरण उपयुक्त पातळीत येण्याचे ही पहिलेच उदाहरण ठरले आहे.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता धरण मृत पातळीवरून उपयुक्त पातळीत आले. त्यावेळी धरणात एकूण ६३.४५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यात उपयुक्त पाणीसाठा ०.३४ टक्के इतका होता. म्हणजे उपयुक्त पाणीसाठा ०.२१ टीएमसी इतका होता. त्यावेळी दौंड येथून धरणात ३० हजार क्युसेक विसर्गाने पाणी मिसळत होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होऊन तो ६५.७८ टीएमसीपर्यंत वधारला. उपयुक्त पाणीसाठा २.१२ टीएमसी होता. त्याची टक्केवारी २.१२ इतकी होती. दुसरीकडे दौंड येथून धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग चार हजार क्युसेकने वाढून ३४ हजार २३४ क्युसेक एवढा झाला.
गतवर्षी उजनी धरण संपूर्ण क्षमतेने म्हणजे १२३ टीएमसी एवढे भरले होते. परंतु, त्यातील तब्बल ७० टीएमसी पाणीसाठा अवघ्या चार महिन्यांत फस्त झाला होता. त्यानंतर धरणातील मृत पातळीतील पाणीसाठा वापरण्यात येत होता. त्यामुळे गेल्या २१ मे पर्यंत धरणात एकूण सुमारे ४९ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. त्याची टक्केवारी वजा २२.९६ इतकीच होती.
तथापि, त्यानंतर सुदैवाने चालू कडक उन्हाळ्यातही वळवाच्या जोरदार पावसाने सातत्याने हजेरी लावली. त्यामुळे धरण झटपट भरण्यास मदत झाली. गेल्या आठवडाभरात धरणात मृत पातळीतील २२.९६ टक्के आणि उपयुक्त ३.९६ टक्के असा मिळून एकूण सुमारे २७ टक्के पाणीसाठा वधारला. यातून धरणात सुमारे १७ टीएमसी इतका पाणीसाठा झाल्याचे दिसून आले.