पंढरपूर : वीर आणि उजनी धरणातून भीमा म्हणजेच चंद्रभागा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्याचा परिणाम पंढरीतील चंद्रभागा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. येथील वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच सर्व घाटाच्या पायरीला पाणी पोहचले आहे. प्रशासनाने जीवरक्षक दलाची तुकडी, ध्वनिक्षेपकावरून भाविक, नागरिकांना सूचना दिल्या जात असून, प्रशासन सतर्क झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वीर आणि उजनी धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणत नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सायंकाळी सहा वाजता वीर धरणाच्या सांडव्यातून २० हजार ९६० क्युसेक पाणी आणि विद्युतगृहाद्वारे १ हजार ४०० क्युसेक असे एकूण २२ हजार ३६० क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात आले असल्याची माहिती नीरा उजवा कालवा येथील कार्यकारी अधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे दिली. नीरा नदीचे पाणी अकलूज येथून पुढे भीमा म्हणजेच चंद्रभागा नदीला मिसळते. तसेच उजनी धरणातून जवळपास ४१ हजार क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
या दोन्ही धरणांतून आलेल्या पाण्यानी वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. घाटाला पाणी लागले आहे. त्यामुळे भाविकांना घाटावर स्नान करावे लागत आहे. प्रशासनाने जीवरक्षक दलाची तुकडी, ध्वनिक्षेपकावरून भाविक, नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. सर्व ठिकाणी पोलीस, होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अवघ्या चौदा दिवसांवर आषाढी एकादशी आहे. यात्रेला १४ ते १५ लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातील पाणी हे नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पंढरीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नदीत स्नान करताना प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.