सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या बहुचर्चित ‘२.०’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूक अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये अभिनेता सलमान खानने अनपेक्षितपणे हजेरी लावली होती. सदर कार्यक्रमासाठी आमंत्रितांच्या यादीत नसतानाही समलमानने या कार्यक्रमामध्ये येत अनेकांचेच लक्ष वेधले होते. पण सध्या मात्र याबाबतच्या वेगळ्याच चर्चा रंगत आहेत. या कार्यक्रमामध्ये सलमान खान येणार हे ‘२.०’च्या संपूर्ण टीमपैकी काही जणांना आणि करण जोहरलाही ठाऊक होते.

वाचा: ‘बाहुबली २’ ला टक्कर देण्यासाठी अक्षय सज्ज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘प्रश्नोत्तराच्या सत्राला सुरुवात होण्यापूर्वी अगदी शेवटच्या मिनिटाला त्या कार्यक्रमामध्ये अभिनेता सलमान खान येणार हे आधीच ठरलेले होते. चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण करण्याच्या त्या कार्यक्रमाला पाच वाजता सुरुवात होणार होती. प्रसारमाध्यमांना तेथे ४ वाजता बोलवण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी चित्रपटातील महत्त्वाचे अभिनेते रजनीकांत, अक्षय कुमारही वेळेत हजर होते. अभिनेता अक्षय कुमारचा कोणताही कार्यक्रम सहसा वेळेतच सुरु होतो. पण, फक्त सलमान खान येणार असल्यामुळे हा कार्यक्रम ५ वाजून ४५ मिनिटांनी सुरु करण्यात आला’.  तर मग आता सलमानला या कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण कोणी दिले? हाच प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत आहे. या प्रश्नावरुन होणाऱ्या चर्चा आणि सलमान-अक्षयची मैत्री पाहता खिलाडी कुमारनेच सलमानला या कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण दिले आहे असेच अनेकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, एका दिमाखदार सोहळ्यात बहुचर्चित ‘२.०’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण करण्यात आले. ‘२.०’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यासाठीच्या कार्यक्रमाला दिमाखात सुरुवात झाली आणि प्रश्नोत्तरांच्या सत्राला सुरुवात होणार इतक्यातच ‘२.०’ या चित्रपटाच्या टीममधील एका व्यक्तीने अक्षय कुमारकडे धाव घेतली आणि त्याच्या कानात तो काहीतरी कुजबुजला. त्या टीम मेंबरने प्रवेशद्वाराकडेही बोट दाखवत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. अभिनेता अक्षय कुमारही तातडीने त्याच्या खुर्चीवरुन उठला आणि त्याने प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. हा सारा गोंधळ आणि धावाधाव होण्याचे कारण होते अभिनेता सलमान खान. आमंत्रितांच्या यादीमध्ये नसतानाही अभिनेता सलमान खानने हजेरी लावत उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. सलमान येताच खिलाडी कुमारने त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. खिलाडी कुमारची भेट घेतल्यानंतर सलमान सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेण्यासाठी पुढे सरसावला. त्यानंतर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धूरा सांभाळणाऱ्या करण जोहरने सलमानला व्यासपीठावर बोलावले. चित्रपट वर्तुळामध्ये आणि सोशल मीडियावरही सलमानच्या या सरप्राईज एन्ट्रीची चांगलीच चर्चा झाली.