‘दंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता आमिर खान प्रकाशझोतात आला आहे. या चित्रपटानंतर आमिर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होणार आहे. या चित्रपटामध्ये आमिरसोबतच आणखीन एक अभिनेता, महानायक अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूडमधील हे दोन्ही कलाकार या एकाच चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असल्यामुळे या चित्रपटाची बी टाऊनमध्ये चर्चा रंगत आहे. पण, आदित्य चोप्रा यांची निर्मिती असणारा हा चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेच आला आहे असेच काहीसे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे या चित्रपटातील अभिनेत्रीची निवड. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटातील एका भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाला प्राधान्य देण्यावरुन अभिनेता आमिर खान आणि निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्यामध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे. आमिर या चित्रपटामधील महत्त्वाच्या भूमिकेसाठी आलियाच्या नावाला प्राधान्य देत आहे. पण, आदित्यने मात्र अभिनेत्री वाणी कपूरच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे चित्रपटातील लिडिंग लेडीच्या निवडीवरुन या दोघांमध्येही वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘धूम ३’चे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य करणार आहेत. तुर्तास, सध्या चर्चेत असलेल्या ‘दंगल’ या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाकांक्षी वडिलांची त्यांच्या मुलींना प्रोत्साहन देण्याची सत्य कथा या चित्रपटात साकारण्यात आली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.