पत्रकार रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ कार्यक्रमात अभिनेत्री कंगना रणौतने बरेच खुलासे केले. या मुलाखतीनंतर आपल्या परखड मतांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगनाचीच सध्या सर्वत्र चर्चा होतेय. हृतिक रोशन, आदित्य पांचोली, करण जोहर आणि अध्ययन सुमनवर तिने केलेल्या आरोपांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय. या आरोपांनंतर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानने त्याला पाठिंबा दर्शविला तर करण जोहरने तिला कृतघ्न म्हटलं. आदित्य पांचोलीनंही कंगनाला वेडी म्हणत तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. यानंतर एकेकाळी कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या अध्ययन सुमननेही प्रतिक्रिया दिलीये.

अध्ययन सुमनने कंगनावर मारहाण आणि जादूटोणा केल्याचा आरोप केलेला. अध्ययनचे हे आरोप फेटाळत त्याचं वजन ९५ किलो आणि माझं ४९ किलो असताना मी त्याला कसं मारु शकेन असा प्रश्न कंगनाने या मुलाखतीत उपस्थित केला. अध्ययनचे हे आरोप ऐकल्यानंतर त्याला खरंच मारायला हवं होतं असंही तिने म्हटलं. यावर ‘इंडियन एक्स्प्रेस’ने अध्ययनशी संपर्क साधला असता या मुलाखतीविषयी आपल्याला काहीच माहित नसल्याचे त्याने सांगितले.

Tumhari Sulu first poster: अन् विद्या बालन ठरली विजेती

‘कंगनाची मुलाखत मी पाहिली नाही. माझ्या आयुष्यात इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या मुलाखतीबाबत मला जाणून घेण्याचीही इच्छा नाही,’ असं तो म्हणाला. मुलाखतीत कंगनाने त्याच्याविषयी जे काही म्हटलं ते त्याला सांगितले असता, तो पुढे म्हणाला की, ‘लोकांची आपापली मतं असू शकतात आणि यावर माझं काहीच मत नाही.’ त्यामुळे एक प्रकारे अध्ययनने कंगनावर मत देणं टाळलं असंच म्हणावं लागेल.