यंदाच्या वर्षी आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करत ‘संजू’ने बाजी मारली आहे. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं असून, या चित्रपटानंतर आता रणबीरच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने एक कलाटणी मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही. रणबीर सध्या आयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असला तरीही त्याच्या वाट्याला आता इतरही चित्रपटांचे प्रस्ताव येऊ लागले आहेत.

‘फिल्मफेअरने’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार राजकुमार हिरानी येत्या काळात ‘मुन्नाभाई ३’ हा चित्रपट साकारणार असून, त्यातही रणबीरची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ‘संजू’ साकारण्यासाठी रणबीरने घेतलेली मेहनत पाहता हिरानी यांचं मन जिंकण्यात तो खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण ‘मुन्नाभाई ३’ या चित्रपटात ‘सर्किट’च्या भूमिकेसाठी अर्शद वारसीऐवजी रणबीरच्या नावाला प्राधान्य देण्यात येत आहे. तेव्हा आता एखाद्या सावलीप्रमाणे मुन्नाभाईसोबत दिसणाऱ्या सर्किटचा चेहरा बदलणार, असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

‘मुन्नाभाई’च्या या चित्रपटांच्या सीरिजमध्ये अर्शद वारसीच्या भूमिकेसाठी कोणा दुसऱ्या अभिनेत्याच्या नावाला प्राधान्य देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य म्हणजे गेल्या बऱ्याच काळापासून अर्शदच्या करिअरमध्ये अडचणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा ‘सर्किट’ गेल्या काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूरावल्याचं स्पष्ट होत आहे. तेव्हा आता येत्या काळात नेमकं मुन्नाभाईचा ‘सर्किट’ कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.