बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार कलाविश्वाप्रमाणेच समाजकार्यातही सक्रियपणे सहभाग घेत असतो. अनेक वेळा अडीअडचणीत सापडलेल्या नागरिकांना तो मदत करत असतो. सध्या देशावर करोनाचं सावट असल्यामुळे या काळातही तो गरजुंना आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करत आहे. नुकतंच अक्षयने मुंबई पोलिसांमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचं (Fitness Health Tracking Device) वाटप केलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या या कार्याची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षयचे आभार मानले आहेत.

नाशिक पोलिसांनंतर अक्षयने मुंबई पोलिसांमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचं वाटप केलं. या डिवाइसमुळे पोलिसांच्या शरीराचं तापमान, ऑक्सिजनची क्षमता, हृदयाचे ठोके हे तपासता येणार आहे. त्यामुळे त्याचं हे कार्य पाहून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अक्षयचं कौतुक करत त्याचे आभार मानले आहेत.

“अक्षय कुमारने आपल्या देशातील सशस्त्र दल, वेगवेगळ्या राज्यातील पोलीस दल यांना पाठिंबा दिला आहे. आपल्या करोना योद्धांची काळजी घेतल्यामुळे मनापासून तुमचे आभार. यावेळी आम्ही यातील काही डिवाइस बीएमसी कर्मचाऱ्यांना देण्याविषयीही चर्चा केली”, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, करोना काळात अक्षय विविध माध्यमातून गरजुंची मदत करत आहे. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यांसाठी त्यांनादेखील मदत करत आहे. त्यामुळे अक्षय कलाविश्वाप्रमाणेच समाजकार्यातही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त तो ‘सूर्यवंशी’, ‘बेलबॉटम’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे.