उत्तम अभिनयासोबतच अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेणारा अभिनेता म्हणजे आमिर खान. बॉलिवूडसोबतच आमिर खान महाराष्ट्रातील अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत असतो. तसचं अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्याचा सहभाग पाहायला मिळतो.

मात्र मिस्टर परफेक्शनिस्टची एक वाईट सवय़ अनेकांना माहित नसेल. सुरुवातीच्या काळात आमिर खान त्याच्यासोबत सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा. मी हात वाचून भविष्य सांगू शकतो असं म्हणत तो अभिनेत्रींना हात पुढे करायला सांगत आणि त्याचवेळी त्यांच्या हातावर थुंकून पळ काढत असे. अनेक अभिनेत्रींच्या हातावर तो थुंकला असून आमिर खानने स्वत: याची कबुली दिली आहे. 2016 मध्ये पार पडलेल्या ‘जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिवल’मध्ये आमिरने त्याच्या या खोड्यांची कबुली दिली होती.

या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. यावेळी ‘जो जीता वही सिकंदर’ ची टीम आपले अनुभनव शेअर करत असताना या सिनेमाची दिग्दर्शक असलेल्या फराह खानने आमिरच्या या खोडकर स्वभावाचा पडदाफाश केला.” आमिर खान हे प्रत्येकासोबत करायचा आणि तो अजूनही ते करतो. त्याचं असंय कि तो म्हणतो, दे मी तुझा हात वाचतो आणि तो हातावर थुंकून पळून जातो.” असं फराह म्हणाली. यावर आमिर खानने कबुली दिली आहे. बरेच वर्ष लोटली असली तरी आमिर आजदेखील नव्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकतो. दंगल सिनेमाच्या शूटिंगवेळी सिनेमातील अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या हातावर थुंकल्याचं आमिरने या कार्यक्रमात मान्य केलं.

आपण करत असलेल्या या कारनाम्याची कबुली देताना आमिर म्हणाला, “मी हे का करतो.? हे खूप महत्वाचं आहे. मी का माझ्या हिरोईनच्या हातावर थुंकतो हे जाणून घेणं महत्वाचं आहे. मी ज्या माझ्या हिरोइनच्या हातावर थुंकलो ती नंबर वन झालीय.” पुढे हसत तो म्हणाला, “ही माझी जबाबदारी आहे असं करणं. माधुरी, जूही सगळ्यांच्या हातावर थुंकलो आहे मी. सगळ्या नंबर वन आहेत.” असं तो मिश्किलपणे म्हणाला.

अनेक अभिनेत्रींनी आमिरच्या या खोड्यांकडे दूर्लक्ष केलं मात्र अभिनेत्री जूही चावला आमिरच्या या कृत्याने चांगलीच नाराज झाली होती. 1997 सालात आलेल्या ‘इश्क’ सिनेमाच्या सेटवर सर्वांच्या समोर आमिरने भविष्य वाचण्यासाठी जूहीला हात पुढे करण्यासाठी सांगितलं. तिने हात पुढे करताच आमिर तिच्या हातावर थुंकला आणि त्याने पळ काढला. आमिरचा राग आल्याने जुहीने दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या शूटिंगला येण्यास नकार दिला. यावर आमिरलादेखील जूहिचा राग आला.या घटनेनंतर दोघेही काही वर्ष एकमेकांशी बोलले नाही. बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा बोलू लागले.

तर आमिर खानने ‘दिल’ या सिनेमाच्या शूटिंगवेळी अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबतही अशी मस्करी केली होती. त्यानंतर माधुरी प्रंचड चिडली. सिनेमातील गाण्याचं शूटिंग सुरु असताना आमिर खान माधुरीला म्हणाला “मला भविष्य वाचता येत.” य़ावर माधुरीने लगेचच हात पुढे केला. क्षणाचा विलंब न करता आमिर माधुरीच्या हातावर थुंकून पळत सुटला.
बॉलिवूडमध्ये आमिर खानसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींना आमिरच्या या मस्करी करणाऱ्या स्वभावाची पुरती कल्पना आहे. ‘जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिवल’ मध्ये देखील आमिरच्या या खोड्या ऐकून सेलिब्रिटींमध्ये हशा पिकला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आमिर खानला करोनाची लागण झाली असून सध्या तो होम क्वारंटीन आहे. मात्र यादरम्यान आमिरच्या या जुन्या गोष्टी नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा चघळायला सुरुवात केली आहे. अनेक नेटकरी आमिरच्या कृत्यावर व्यक्त होतं आहेत.