प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव याला एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी कानपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत. राजू श्रीवास्तवसोबतच त्याच्या काही सहकार्यांनादेखील असाच धमकीचा फोन आल्याचं सांगण्यात येत आहे.

राजू श्रीवास्तवला व्हॉट्स अॅप कॉलवर हा धमकीचा फोन आला आहे. यात त्याच्या मुलांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोबतच लखनौच्या कमलेश तिवारीसारखी परिस्थिती करु असंही, या अज्ञात इसमाने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी कॉमेडियनने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

पाहा : बाळाच्या आगमनासाठी All Set! थाटात पार पडलं अनिता हसनंदानीचं बेबीशॉवर, पाहा फोटो

हा धमकीचा फोन पाकिस्तानमधील कराची येथून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. राजू श्रीवास्तवसोबत त्याचे मित्र अजीत सक्सेना व गरवित नारंग यांनादेखील असेच धमकीचे फोन आले आहेत.

दरम्यान, विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वीदेखील राजूला असाच धमकीचा फोन आला होता. त्यावेळीदेखील त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. राजू श्रीवास्तव हा प्रसिद्ध विनोदवीर आहे. त्याने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘बिग बॉस 3′,’ स्टॅण्ड अप कॉमेडी’ अशा रिअॅलिटी शोमध्ये झळकला आहे.