अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन एक आठवडा उलटला आहे. १४ जून रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीव संपवलं. परंतु त्याच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे सुशांतने नैराश्यात हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळल्यामुळे त्याने आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं असून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर मत मांडली आहेत. यातच अभिनेता दलीप ताहिल यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार अलिकडेच दलीप ताहिल यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सुशांत सिंहच्या आत्महत्येविषयी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. “बॉलिवूडमध्ये बॉक्सऑफिसवरील आकडेवारीच सगळं काही ठरवत असते आणि सुशांत हा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवणारा अभिनेता होता. त्यामुळे तिकिट बारीवर भरघोस कमाई करणाऱ्या अभिनेत्याला कधीत बॉयकॉट केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येमागे करिअरमधील चढउतार हे कारण असू शकत नाही. त्यामुळे त्याच्या निधनामागे अनेक कारणं असतील मात्र केवळ करिअर हे एकच कारण असू शकत नाही”, असं दलीप ताहिल म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “काही वेळा दिग्दर्शकांसोबत त्याचे काही मतभेद झाले असतील. बऱ्याच वेळा चित्रपटाच्या करारामध्ये काही समस्या असल्यास कलाकार चिंतेत येतात. पण जो कलाकार प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहापर्यंत खेचू शकतो, तो जॉबलेस नाही होऊ शकत”.

दरम्यान, सुशांतच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. काहींच्या मते, बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने त्याचं जीवन संपवलं असं म्हटलं जात आहे. त्यामुळे अनेकांनी सलमान खान, करण जोहर यांना सुशांतच्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरवलं आहे.