संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' या चित्रपटातील 'डोला रे डोला' हे गाणं विशेष गाजलं. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व माधुरी दीक्षित यांचं अप्रतिम नृत्य, सरोज खान यांचं नृत्यदिग्दर्शन, गाण्यातील कलाकारांची वेशभूषा, भव्यता या सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आजही काही गाण्यांची तुलना 'डोला रे डोला' या गाण्याशी केली जाते. यामागचं श्रेय ऐश्वर्या आणि माधुरी यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीला जातं. भन्साळींचं चित्रपट भव्यतेसाठी ओळखणं जाणारं असल्याने या गाण्यासाठीही अभिनेत्रींवर भरपूर मेकअप, दागिने, भरजरी कपड्यांचा वापर करण्यात आला होता. मात्र याच भरजरी दागिन्यांमुळे ऐश्वर्याला चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली होती. वजनाने जड असलेले कानातले घातल्याने ऐश्वर्याच्या कानाला दुखापत होऊन तिच्या कानातून रक्त येऊ लागलं होतं. मात्र तरीही तिने चित्रीकरण थांबू दिलं नाही. तिच्या कानातून रक्त येत होतं हेही तिने सेटवर कोणाला कळू दिलं नव्हतं. ऐश्वर्याची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून आजही तिचं कौतुक केलं जातं. 'डोला रे डोला' हे गाणं कोरिओग्राफर सरोज खान यांनी दुर्गापूजाच्या पार्श्वभूमीवर कोरिओग्राफ केलं होतं. बरेच रि-टेक्स घेतल्यानंतर भन्साळींच्या मनासारखं हे गाणं शूट करण्यात आलं. या गाण्यातील नृत्यात कथ्थक व भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकाराचेही काही स्टेप्स होते. याच्या कोरिओग्राफीसाठी सरोज खान यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.