झी मराठी वाहिनीवरील ‘कानाला खडा’ हा शो सध्या चांगलाच गाजत आहे. संजय मोने सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी उपस्थिती लावली. दीक्षित डाएटला फॉलो करणारे अनेकजण आजकाल पाहायला मिळतात. या शोमध्ये त्यांनी आहाराबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

यावेळी डॉ. दीक्षितांनी प्याले रिचवणाऱ्यांच्या ग्लासात मिठाचा खडा टाकला आहे. डाॅक्टर सांगतात, काही जण येतात आणि विचारतात डाॅक्टर दोन पेग रोज घ्यायची सवय आहे. काय करू? त्यावर ते म्हणतात, जे काही करायचंय ते 55 मिनिटांत करा. पण लिव्हर बिघडण्याची जबाबदारी तुमची. प्रेक्षकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना डॉ. दीक्षितांनी शरीरसौष्ठवाच्या चुकीच्या कल्पनांवर बोट ठेवलंय. ‘सिक्स पॅक वगैरे टिकत नाहीत. ते अनैसर्गित आहे. आहारासोबतच रोज ४५ मिनिटं चाललं पाहिजे,’ असं ते म्हणाले.

अनेकांना व्यायामाचा कंटाळा येतो. अशा लोकांसाठीही त्यांनी सल्ला दिला आहे. ‘एखाद्याला व्यायाम करणं जमत नसेल तर त्यानं सायकलिंग करा. अगदी पलंगावर आडवं झोपून हवेत सायकलिंग केलंत तरी त्याचा परिणाम होईल,’ असं त्यांनी सांगितलं.