अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ येत्या २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून लवकरच चित्रपटाचं टायटल ट्रॅकदेखील प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानिमित्ताने प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फराह खानने या गाण्याशी निगडीत सुशांतची एक आठवण शेअर केली आहे. हे टायटल ट्रॅक करण्यापूर्वी सुशांतने तिच्यासमोर एक अट ठेवल्याचं तिने म्हटलं आहे.

हे गाणं आम्ही केवळ एका दिवसात शूट केलं असून सुशांतने एका टेकमध्ये ते पूर्ण केलं होतं. परंतु, त्याबदल्यात त्याने एक अट ठेवली होती. मात्र त्याची ही अट अखेरची ठरली, असं फराहने एका मुलाखतीत सांगितलं.

“हे गाणं माझ्यासाठी अत्यंत जवळच आहे. कारण पहिल्यांदाच मी सुशांतसाठी ते कोरिओग्राफ केलं होतं. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. परंतु, एकत्र काम करण्याची कधीच संधी मिळाली नव्हती. हे गाणं एका शॉटमध्ये चित्रीत व्हावं अशी माझी इच्छा होती, कारण मला सुशांतवर पूर्ण विश्वास होतो, त्यालाच हे करणं शक्य आहे”, असं फराह म्हणाली.

पुढे ती म्हणते, आम्ही दिवसभर या गाण्याचा सराव केला आणि अर्ध्या दिवसातच हे गाणं तयार झालं होतं. मात्र हे गाणं उत्तमरित्या सादर करण्यासाठी सुशांतने माझ्यासमोर एक अट ठेवली होती. तो म्हणाला होता. हे गाणं मी एका टेकमध्ये पूर्ण करेन. पण त्यापूर्वी माझी एक अट आहे. त्याबदल्यात मला तुझ्या घरी जेवायला बोलवावं लागेल. सुशांतने ही शेवटची अट माझ्यासमोर ठेवली होती. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मी त्याला जेवायलाही बोलावलं. हे गाणं शूट झाल्यानंतर मी पाहिलं, तो खरंच अत्यंत सुंदर आणि वेगळ्याच अंदाजात थिरकला होता. तो हा डान्स करताना फार खूश दिसत होता”.

दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर त्याच्या मित्रपरिवारातील अनेकांनी त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुशांतने वयाच्या ३४ व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर कलाविश्वामध्ये एकच खळबळ उडाली असून त्याच्या आत्महत्येचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ‘दिल बेचारा’ हा सुशांतचा अखेरचा चित्रपट ठरला असून तो येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.