प्रजासत्ताक दिन आणि त्याला जोडून आलेली शनिवार-रविवारची सुटी यामुळे बरेच कार्यक्रम होत आहेत. याच निमित्ताने काही नाटय़प्रयोगही पाहता येणार आहेत. त्यात बालनाटय़ापासून ते नाटकांपर्यंत सारं काही आहे. या नाटय़प्रयोगांचा आनंद या सुटीच्या निमित्तानं नक्कीच घेता येईल.

सध्याच्या वेगवान आणि तंत्रज्ञानाच्या काळात नातेसंबंधही व्यामिश्र झाले आहेत. नात्यांमध्ये गुंतागुंत निर्माण झाली आहे. नात्यांना असलेले वेगवेगळे पदर उलगडत त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न ‘अधुरे’ या नाटकांतून करण्यात आला आहे. स्वानंद बर्वे लिखित-दिग्दíशत या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी (२६जानेवारी) सुदर्शन रंगमंच येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे.

एक तरूण अभिनेता आणि एक प्राध्यापक असलेली तरूणी एका पार्टीत भेटतात. पार्टीनंतर ते दोघं रात्रभर एकत्र राहतात. रात्रभरात ते आयुष्य आणि नातेसंबंध अशा अनेक विषयांवर गप्पा मारतात. त्यातून त्यांचं पूर्वायुष्य उलगडत जातं. त्या रात्रीनंतर त्या दोघांचं काय होतं, त्यांच्यातल्या नातेसंबंधाचं काय होतं या कथासूत्रावर ‘अधुरे’ हे नाटक बेतलं आहे. ‘शब्दमेघ’ या संस्थेनं नाटकाची निर्मिती केली आहे. त्यात क्षितिज दाते आणि अनुराधा आठलेकर यांच्या भूमिका आहेत.

‘आताच्या काळात आपल्या आजूबाजूच्या इमारती आणि रस्तेच काँक्रिटचे होत आहेत असं नाही, तर आपली मनंही काँक्रिटची होऊ लागली आहेत. कारण, त्यात भावभावना मुरतच नाहीत. नातं टिकण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो, तो आपल्याकडे नसतो. आजूबाजूच्या वेगाबरोबरच आपली नातीही संपुष्टात येतात. या सगळ्याकडे पाहण्याचा, नात्यांचे पदर उलगडण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे,’ असं स्वानंद बर्वे याने सांगितले.

बालनाटय़ातून अवतरणार तुकाराम

पुण्यातल्या नाटय़विश्वात ‘स्वतंत्र थिएटर्स’ या संस्थेनं स्वतचं वेगळेपण निर्माण केलं आहे. केवळ विविध नाटय़प्रयोगच नाही, तर सातत्याने हिंदी नाटकंही ही संस्था करत आहे. आता या संस्थेनं संतश्रेष्ठ तुकारामांच्या जीवनकार्याचा वेध ‘तुकाराम’ या हिंदी नाटकातून घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हे बालनाटय़ आहे. या नाटकाचा प्रयोग रविवारी (२८ जानेवारी)  घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सभागृह येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे.

धनश्री हेबळीकर हिने लिहिलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन अभिजित चौधरी याने केले आहे. युवराज शहा यांनी निर्मिती केली आहे. क्रिश सुरेका, जयार्थ सेनगुप्ता, सिमरन िपगळे, मोक्ष शहा, गुल मेहता, रिधिमा पांडे, अनन्या मंत्री, आरव हेगडे यांच्या नाटकात भूमिका आहेत. तुकारामांच्या बालपणापासून ते त्यांच्या संत होण्यापर्यंतचा प्रवास या नाटकातून मांडण्यात आला आहे. नाटकाविषयी दिग्दर्शक अभिजित चौधरी याने ही माहिती दिली. ‘संत तुकाराम यांनी केवळ अध्यात्मिक कार्य केलं नाही, तर समाजाला दिशा देण्याचेही काम त्यांनी केले. या बालनाटय़ातून त्यांच्या आयुष्यातले विविध टप्पे, त्यांचा बदलत गेलेला दृष्टिकोन, कुटुंब याचा वेध घेण्यात आला आहे,’ असे अभिजित याने सांगितले.

सोसायटय़ांतील कलाकारांचा आशियानामध्ये आविष्कार

गणेशोत्सव, नवरात्र, वर्धापन दिन अशा उत्सवांनिमित्त सोसायटय़ांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या व्यतिरिक्त दैनंदिन कामात व्यग्र असणारे सोसायटय़ांमधील कलाकार आता रंगमंचावर येणार आहेत. पुण्यातील विविध निवासी सोसायटय़ांचा नाटय़ाविष्कार आशियाना करंडक आंतरसोसायटी एकांकिका स्पध्रेमध्ये होणार आहे. शनिवारपासून (२७ जानेवारी) ३१ जानेवारी या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे ही स्पर्धा रंगणार आहे.

निवासी सोसायटय़ांमधील कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या उपक्रमाचे कलाक्राफ्टच्या रश्मिता शहापूरकर आणि रमेश पाटणकर यांनी आशियाना करंडक या स्पध्रेमध्ये रूपांतर केले आहे. प्रसिद्ध रंगकर्मी किरण यज्ञोपवित यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता स्पध्रेचे उद्घाटन होणार आहे. स्पध्रेमध्ये एकूण ३० एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. स्पध्रेतील एकांकिकेचे तंत्र आणि त्याचे सादरीकरण अधिक सफाईदारपणे होण्याच्या दृष्टीने अतुल पेठे, अजय पूरकर, नरेंद्र भिडे, प्रदीप वैद्य, चिन्मयी सुमित, राहुल रानडे, प्रणित कुलकर्णी आणि मििलद िशत्रे यांनी कलाकारांना मार्गदर्शन केलं आहे.

यंदाच्या स्पध्रेचं वेगळेपण म्हणजे, स्पध्रेतील एकांकिकांच्या सादरीकरणाप्रू्वी संघांनी कशी तयारी केली याची चित्रफीत पाहता येणार आहे. एकांकिकांच्या तालमींदरम्यानचे तयारीचे उत्कट क्षण, काही किस्से, त्या दरम्यान घडलेल्या गमती आणि गप्पांचे रंगलेले फड, मनोगते यांवर आधारित या चित्रफिती असतील. सोसायटय़ांतील उत्साही रंगकर्मीच्या जल्लोषाने यशवंतराव चव्हाण नाटय़गृह दणाणून जाणार आहे.

chinmay.reporter@gmail.com