छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे चंद्र आहे साक्षीला. श्रीधरचं स्वातीच्या आयुष्यात येणं आणि त्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणं या एका घटनेमुळे ही मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. श्रीधरने विश्वासघात केल्यानंतर संग्रामने स्वातीला मैत्रीचा आधार देत तिला सांभाळून घेतलं. विशेष म्हणजे याच संग्रामसोबत आता स्वाती लग्नगाठ बांधणार असून दोघांच्या घरी लग्नाची धामधूम सुरु झाली आहे.

संग्राम आल्यानंतर स्वातीचं आयुष्य पार बदलून गेलं आहे. मात्र, यातही श्रीधर कुरापती करत आहे. परंतु, संग्रामची स्वातीला खंबीरपणे साथ आहे. त्यामुळेच स्वातीने संग्रामसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाती आणि संग्राम या दोघांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली असून यातही श्रीधर मोडता घालण्याचा प्रयत्न करत आहे.

स्वाती आणि संग्राम यांच्या लग्नासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे हे लग्न निर्विघ्न पार पडेल का? या आनंदसोहळ्यात श्रीधर मीठाचा खडा तर टाकणार नाही ना ? श्रीधरच्या येण्याने कोणतं नवं वळण येईल ? हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर झाल्याचं दिसून येत आहे.