'आई माझी काळूबाई' ही मालिका सोडल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने एका कार्यक्रमात हजेरी लावली. मालिका सोडण्यामागचं नेमकं कारण आणि मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी केलेल्या विविध आरोपांवर ती व्यक्त झाली. "दीड महिन्यापूर्वी झालेल्या घटनेविषयी अलकाताईंनी तेव्हाच खंबीर भूमिका घेतली असती तर आज आरोप-प्रत्यारोप करायची ही वेळ आली नसती", अशी खंत तिने व्यक्त केली. यावेळी बोलताना प्राजक्ताला अश्रू अनावर झाले. काय म्हणाली प्राजक्ता गायकवाड? "मी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत दोन वर्षे काम केलं. त्यांना माझा कधीच त्रास झाला नाही. त्याआधी नांदा सौख्य भरे मालिकेच्या निर्मात्यांनी माझी कधीच तक्रार केली नाही. आता हे सगळं पाहिलं की मला बदनाम करण्यासाठी पाऊलं उचलली जातायत असं वाटतंय. माझ्या हृदयात अलका कुबल यांचं आदराचं स्थान आहे आणि आयुष्यभर ते तसंच राहील. त्या मला आईसमान आहे. पण सहकलाकाराने मला शिवीगाळ केल्यानंतर निर्मात्या म्हणून त्यांनी त्यावेळी योग्य ती भूमिका घेणं गरजेचं होतं. कलाकारांमध्ये वादविवाद होत असतात, पण जेव्हा मला असह्य झालं तेव्हा मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. कारण ज्या व्यक्तीने मला शिवीगाळ केली त्याने माझी कधीच माफी मागितली नाही. त्याच व्यक्तीसोबत काम करणं मला अवघड जात होतं. केवळ मालिका पुढे चालवायची म्हणून तुम्ही अशा नराधमांना पदराआड लपवता आहात. ज्या व्यक्तीला आपण आईसमान मानतो, लेकरू जेव्हा अडचणीत असतं तेव्हा तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असतं", अशा शब्दांत प्राजक्ता तिच्यावर झालेल्या सर्व आरोपांवर व्यक्त झाली. आणखी वाचा : “तिला लाजच नाही”; प्राजक्ता गायकवाडवर भडकल्या अलका कुबल मालिकेच्या एकाही दिवसाचंही मानधन मिळालं नसल्याचं तिने यावेळी स्पष्ट केलं. प्राजक्ता ही सेटवर उशिरा येते, नखरे करते असे आरोप अलका कुबल यांनी केले होते.