काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफ आणि रणवीर कपूरचे ब्रेकअप झाले. पण व्यावसायिकतेमध्ये वैयक्तिक समस्यांना कसे दूर ठेवायचे हे दोघांनाही माहित आहे. म्हणूनच व्यावसायिक कारणाने का असेना कॅट व रणबीर ‘जग्गा जासूस’च्या निमित्ताने एकत्र आले. अनुराग बसूच्या या चित्रपटाची धडाक्यात शुटींग सुरु झाले खरे पण तेव्हापासून आजपर्यंत चित्रपटाशी संबंधित रोज नवा वाद कानावर पडू लागला. ‘जग्गा जासूस’च्या शुटिंगमध्ये एक ना अनेक समस्या येतच राहिल्या. कधी कॅट व रणबीर सेटवर एकमेकांशी जुळवून घेऊ शकत नसल्याचे कानावर आले तर कधी अनुराग बसूच्या मनासारखा चित्रपट तयार झाला नसल्याचेही ऐकू आले.
इतकेच नाही तर कतरिनाकडे तारखा नसल्याने चित्रपट लांबल्याचेही समजले. मग काय, याबाबत खुद्द कॅटलाच विचारण्यात आले. पण कॅटने मात्र सरळ सरळ कानावर हात ठेवले. माझ्याकडे चित्रपटासाठी तारखा नव्हत्या म्हणून ‘जग्गा जासूस’ रखडला, असे अजिबात नाही. शुटींग लांबले याला दुसरे तिसरे कुणी जबाबदार नसून स्वत: अनुराग बसू जबाबदार आहेत, असे तिने सांगितले. पण थोड्याच वेळात आपण भलतच बोलून गेल्याचे कतरिनाच्या लगेच लक्षात आले. मग काय, तिने गोष्ट शिताफीने पलटवली. अनुरागने चित्रीकरणास वेळ लावला. कारण त्याला प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट हवी असते. प्रत्येक सीन तो कित्येकदा पाहतो आणि समाधानी होईपर्यंत, पुन्हा पुन्हा करायला लावतो. साहजिक चित्रीकरण लांबणारच, असं ती म्हणाली.
आता यात खरं काय नी खोटं हे फक्त कतरिना, रणबीर आणि अनुरागलाच माहित. पण सध्या तरी ‘जग्गा जासूस’ यायला वेळ का लागला याचं कतरिनाने दिलेलं उत्तर खरं मानायला हवं.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2016 रोजी प्रकाशित
म्हणून होतोय ‘जग्गा जासूस’ सिनेमाला विलंब
अनुराग बसूच्या या चित्रपटाची धडाक्यात शुटींग सुरु झाले पण...
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-08-2016 at 21:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reason behind delay of jagga jasoos