आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना तृप्त करणारे प्रसिद्ध गायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाकडून पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचं सांगण्यात आलं आहे. बालसुब्रमण्यम यांनी हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीदेखील गाजवली.

एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी त्यांच्या आवाजाने अनेकांना भूरळ घातली होती. त्यामुळे आजही त्यांची गाणी तितकीच लोकप्रिय आहे. बालसुब्रमण्यम यांना अभिनेता सलमान खान याचा आवाज म्हणून खास ओळखलं जात होतं. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सलमानच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

बालसुब्रमण्यम यांना ऑगस्ट २०२०मध्ये करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली होती. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसातच त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि २५ सप्टेंबर २०२० मध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान,बालसुब्रमण्यम यांची आजवर अनेक गाणी गायली असून त्यांना विसरणं कोणत्याही चाहत्याला शक्य नाही. त्यांची ‘साथिया ये तुने क्या किया’, ‘ये हसीन वादियाँ’, ‘सच मेरे यार’, ‘आ जा शाम होने आयी’, ‘तेरे मेरे बीच में’ ही गाणी तुफान लोकप्रिय झाली.