क्रिकेटविश्व आणि बॉलिवूडचे नाते तसे फार जवळचे आहे. मैत्रीच्या नात्यापासून ते अगदी प्रेमप्रकरणांपर्यंत क्रिकेटजगताचे आणि बॉलिवूडचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सध्या क्रिकेट आणि बी टाऊनमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या नात्याचीच चर्चा रंगत आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला या दोघांच्याही नात्यामध्ये दुरावा आला होता. विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सिंगल’ असे स्टेटसही लिहिले होते, पण काही दिवसांनंतर ते काढून टाकण्यात आले. कालांतराने अनुष्का आणि विराट पुन्हा एकदा एकत्र आले. या दोघांमध्येही ‘ऑल इज वेल’ आहे असे वाटत असतानाच त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा दुरावा आल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या अतिकाळजी घेण्याच्या आणि वारंवार विचारपूस करण्याच्या स्वभावामुळे अनुष्का विराटपासून दूर जाण्याचा विचार करु शकते. अनुष्का सध्या तिच्या चित्रपटसृष्टीतील करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे, पण विराटचा मात्र याला विरोध आहे.

जेव्हा जेव्हा अनुष्का चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने बाहेरगावी जाते तेव्हा विराट तिला वारंवार फोन करत असतो. अनुष्काच्या चित्रपटाच्या वेळापत्रकांवरही विराटची हरकत आहे. सध्या अनुष्का तिच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान अनुष्काला विविध ठिकाणी जावे लागत आहे, हे विराटला मात्र रुचत नसल्याचे दिसते. विराटचे हे असे विचित्र वागणे अनुष्काच्या पथ्यावर पडताना दिसत नाहिये. त्यामुळे या दोघांमध्येही सध्या तणावाचे वातावरण असून हे नाते सध्या तुटण्याच्या मार्गावर आहे असेच दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विराट सध्या कसोटी सामन्यांमध्ये व्यग्र असून भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाची धुरा तो सांभाळत आहे. तर, अनुष्का तिच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असून ‘द रिंग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीही ती वेळ देत आहे. अनुष्का शर्मा लवकरच तिच्या निर्मितीत बनणाऱ्या ‘फिल्लौरी’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंजाबी अभिनेता दिलजित दोसांज आणि अनुष्काच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाबद्दल सध्या उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची कथा लीक झाल्याची चर्चा होती.