अभिनेता वैभव मांगले सध्या खूप चर्चेत आहे. त्याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही काम केले आहे. ‘टाईमपास’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘काकस्पर्श’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘फक्त लढ म्हणा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये वैभवने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यासोबतच त्याने बऱ्याच गाजलेल्या नाटकांमध्येही काम केले आहे. गेली काही वर्ष तो ‘अलबत्या गलबत्या’ या लहान मुलांच्या नाटकात चेटकीणीची भूमिका साकारत होता. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली. पण आता त्याने या नाटकात काम करणे थांबवलं असल्याचा खुलासा त्याने केला आहे.

आठ वर्षांनी मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा दिग्दर्शिकेच्या भूमिकेत, महिला विशेष चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

आज अभिनेता वैभव मांगलेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यांने लिहिलं, “प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो, मी चिंची चेटकिणीचं काम सोडलं आहे. तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की ती मी नाहीच !!”

या पोस्टवर नेटकरी खूप कमेंट्स करत आहेत. वैभव मांगले आता या भूमिकेत दिसणार नसल्याने प्रेक्षक दुःख व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, ‘वैभव सर काही पात्र अजरामर असतात. जो कलाकार ती साकारत असतात ती त्याची असतात. उद्या जर कोणी चार्लीसारखं काम करून दाखवतो तर लोक विश्वास ठेवतील का? चेटकीण फक्त आणि फक्त एकच होती आणि राहणार.’ तर दुसरा चाहता कमेंट करत म्हणाला, ‘तुझ्यासारखी चिंची चेटकीण कोणी पण करू शकणार नाही. खूप वाईट झाले. लहान मुलांचा भ्रमनिरस होणार आता.’ त्यासोबतच अनेकांनी त्याला हे नाटक का सोडलं असा प्रश्नही विचारला आहे. परंतु अद्याप वैभवने हे नाटक का सोडलं याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

हेही वाचा : “टिळकांनी याच साठी केला होता अट्टाहास…!” वैभव मांगलेची ती पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नाकर मतकरींनी हे नाटक रंगभूमीवर आणलं तेव्हा या नाटकात चेटकिणीची भूमिका दिलीप प्रभावळकर करत होते. बरीच वर्ष त्यांनी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर त्यानंतर काही वर्षांनी चिन्मय मांडलेकरने हे नाटक दिग्दर्शित करण्याचं ठरवलं तेव्हा वैभव मांगले यांनी चेटकिणीच्या भूमिका साकारली. त्यांची ही चिंची चेटकीण लहान मुलांच्या आवडीची बनली होती. फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही ती आवडली. आता पुन्हा वैभव चेटकीणीच्या रूपात भेटणार नसल्याने सर्वांचाच भ्रमानिरास झालेला दिसत आहे.