घोळात घोळ होत जातात आणि त्यातून एका विचित्र परिस्थितीत अडकणाऱ्यांची गोष्ट मांडताना ती अनेकदा विनोदी अंगाने सांगितली तर प्रेक्षकांच्या डोक्याला ताप होत नाही. त्यांचं चार घटका मनोरंजन होतं, असं एक गृहीतक मांडून चित्रपटांचा घाट घातला जातो. ‘ऑल इज वेल’ पाहताना दिग्दर्शक योगेश जाधव आणि लेखक – अभिनेता प्रियदर्शन जाधव यांनीही हाच माफक विचार करून चित्रपटाची मांडणी केली आहे हे लक्षात येते. मात्र, घोळात घोळ प्रसंगांची मालिका उभी करताना मनोरंजनाचाच घोळ झाला आहे.
‘ऑल इज वेल’ची मांडणी हलकीफुलकी आहे, याची जाणीव दिग्दर्शक पहिल्या काही दृश्यचौकटीतून करून देतो. त्यासाठी सूत्रधाराचा आधार घेत या चित्रपटातील तीन मुख्य व्यक्तिरेखा अमर, अकबर आणि अँथनी यांची ओळख करून देण्याबरोबरच त्यांची गोष्ट जिथे घडणार आहे किंवा नशीब त्यांना ज्या ठिकाणी एकत्र आणणार आहे, त्यासाठी तयार केलेली पार्श्वभूमी यांचा दिग्दर्शकाने वापर केला आहे. तर या तीन व्यक्तिरेखांच्या नावांमुळे हा चित्रपट प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या धाटणीचा आहे की काय असा विचार चाटून जाऊ शकतो.
मात्र, त्या शैलीचा गोंधळ उभा करायचा प्रयत्न असला तरी सर्वसामान्य तरुणांचे प्रतिनिधी म्हणून त्या व्यक्तिरेखा उभ्या करताना कदाचित विनोदी मांडणीला जोड म्हणून केवळ हा मनमोहन देसाई शैलीत नावं देण्याचा खटाटोप असावा. तर असो… अमर (अभिनय बेर्डे) आहे नागपूरचा, अकबर (प्रियदर्शन जाधव) आहे मालेगावचा आणि तिसरा गडी अँथनी (रोहित हळदीकर) आहे गोव्याचा… तिघंही वेगवेगळ्या कारणाने नशीब अजमावण्यासाठी मुंबईत येतात.
मुंबईत आल्यानंतर तिघांचीही फसगत होते आणि पुढे काय करायचं? इतक्या मोठ्या शहरात राहायचं की आपापल्या घरी परतायचं आणि राहायचं तर कसं, कुठे?… या विवंचनेत असलेले तिघंही एका क्षणी एकत्र येतात. एकमेकांची नकळत मदत करतात आणि पुन्हा एकदा या मायानगरीत दुसरी संधी घेण्याचं ठरवत असतानाच एकापाठोपाठ एक विचित्र प्रसंगात अडकत जातात. त्यातून ते सुटतात का? सगळं ‘ऑल इज वेल’ करतात का? (म्हणजे करणारच ना…) तर त्याची हलकीफुलकी कथा या चित्रपटात पाहायला मिळते.
‘ऑल इज वेल’ची पटकथा मात्र गडबडली आहे. या तिघांच्या नशिबात घडणारी गोष्ट असं मानल्यानंतरही त्यांच्या व्यक्तिरेखांची बांधणी करताना मुळात त्यांची काही वैगुण्ये किंवा अगदी गुणही ठळकपणे मांडले असते, तर त्याचा आधार घेत प्रसंगांची किमान तार्किक बांधणी करता आली असते.
घोळ अनेकदा टोकाचा निरागसपणा असेल तर किंवा तद्दन मूर्ख असतील तर होतात. शहाणासुरता माणूस घोळ घडवून आणतो. पटकथेला उचलून घेईल अशी काही वेगळी मांडणी दिग्दर्शक म्हणून योगेश जाधव यांनी केलेली नाही. त्यामुळे विसविशीत पटकथेला विनोदी मांडणीमुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे थोडा आधार मिळाला असला तरी चित्रपटाचा हवा तसा प्रभाव पडत नाही.
चित्रपटातील सगळ्या व्यक्तिरेखांमध्ये त्यातल्या त्यात खलनायक असलेल्या अप्पाची व्यक्तिरेखा बऱ्यापैकी जमून आली आहे आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी ती त्यांच्या शैलीत छान रंगवली आहे. मात्र, चित्रपटाचा डोलारा ज्या तीन व्यक्तिरेखांवर आहे त्यांचा काहीच प्रभाव पडत नाही. या तिघांकरता छोटेखानी पूरक प्रेमकथाही ठिगळासारख्या जोडलेल्या आहेत.
अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर या दोघांच्या तुलनेत अनुभवी असलेल्या प्रियदर्शनने अकबरची भूमिका गमतीदार केली आहे. बाकी कलाकार खूप असले तरी त्यांना करण्यासारखं फार काही नाही. दिवंगत अभिनेते माधव वझे यांचा हा अखेरचा चित्रपट. त्यांच्याही व्यक्तिरेखेला प्रभाव पाडता येईल असं करण्यासारखं काही नाही.
अभिनेता अजय जाधव यांनी साकारलेला लिंगा मात्र भाव खाऊन जातो. हा चित्रपट विनोदासाठी आवश्यक असलेला आशय बांधण्यात चित्रपट कमी पडतो. मनोरंजनाची मात्रा थोडी फिकी पडते.
ऑल इज वेल
दिग्दर्शक – योगेश जाधव
कलाकार – प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, माधव वझे, अजय जाधव, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, अमायरा गोस्वामी.