अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट सुपरहिट ठरला. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. चित्रपट, चित्रपटामधील संवाद तर कायमच चर्चेत असतात. अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका रुपेरी पडद्यावर हुबेहुब साकारले. या भूमिकेनंतर त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आनंद दिघे यांची आज २१वी पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसाद ओकनेच सांगितलेला किस्सा आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा – “दाऊदच्या गुंडांपासून आनंद दिघेंना वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनात घुसवली होती गाडी”

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटानिमित्त काही महिन्यांपूर्वीच लोकसत्ता ऑनलाईच्या ‘डिजिटल अड्डा’ला प्रसाद ओकने हजेरी लावली होती. यावेळी त्याने आनंद दिघे यांच्याबाबत एक किस्सा सांगितला. प्रसाद म्हणाला, “एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना अनेकदा गुरुपौर्णिमेचा उल्लेख झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त कुणीही मला भेटायला यायचं नाही असा बाळासाहेबांनी आदेश दिला होता. हजारो मैलांचा प्रवास करून खास गुरुपौर्णिमे दिवशी मला भेटायला येण्यासाठी स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नाही असं बाळासाहेबांचं वाक्य होतं. हा संपूर्ण किस्सा एकनाथ शिंदे यांनी प्रविण तरडे यांना सांगितला होता.”

“गुरुपौर्णिमेदिवशी बाळासाहेब कुठेही महाराष्ट्रात असले तरी दिघे साहेब त्यांना शोधून काढायचे. कुठल्या वेगळ्या बंगल्यामध्ये ते गेले आहेत याचा शोध घ्यायचे आणि तिथे जाऊन ते बाळासाहेबांची पूजा करायचे. दिघे साहेब खाली बसून बाळासाहेबांचे पाय धूत आहेत, पायाला चंदन लावून चाफ्याची फुल वाहत आहेत हा संपूर्ण प्रसंग हुबेहुब चित्रपटामध्ये दाखवण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा या सीन पाहिला तेव्हा ते अधिक भावूक झाले. पण प्रत्यक्षात आनंद दिघे गुरुपौर्णिमेला बाळासाहेबांची पूजा करायचे.”

आणखी वाचा – “जोपर्यंत तुम्ही दिघेसाहेब म्हणून समोर आहात, तोपर्यंत…”; प्रसाद ओकने सांगितला सेटवरील ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट यावर्षीचा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. प्रवीण तरडे यांनी लेखन, दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडल्या. तसेच चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आजही या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसते.