‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. आमिरच्या या चित्रपटाची खूप दिवसांपासून चर्चा होती. त्यामुळे हा बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सोशल मीडियावरील बॉयकॉट ट्रेंडचा या चित्रपटाला मोठा फटका बसला. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. या ट्रेंडमुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळल्याचं बोललं जातं आहे. नुकतंच या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता-लेखक अतुल कुलकर्णी यांनी फर्स्टपोस्ट या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले.

या मुलाखतीत अतुल कुलकर्णी यांना ही कथा लिहिण्यासाठी नेमका किती वेळ लागला? याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, “मला ती कथा लिहिण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. मी ती कथा १४ वर्षांपूर्वी लिहिली होती. पण फॉरेस्ट गंपच्या पॅरामाउंटकडून आम्हाला हक्क मिळवण्यासाठी वेळ लागलात. ते हक्क लवकर मिळाले नाहीत.”
पतौडी पॅलेस ८०० कोटी रुपयांना विकत घेण्यामागचे कारण काय? सैफ अली खानने केला खुलासा

“हा चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक नसून रुपांतर आहे. कारण मी या चित्रपटातील काहीही त्या अर्थाने कॉपी केलेले नाही. या चित्रपटासाठीचा सेटअप, संवाद सर्व काही भारतीय पद्धतीचे आहे. त्यामुळे हा संपूर्ण भारतीय चित्रपट असून तो फक्त फॉरेस्ट गंपचे रूपांतर आहे. त्यामुळेच आम्ही त्याला रिमेक नाही तर रुपांतर असे म्हणत आहोत. लाल सिंग चड्ढा हा चित्रपट १०० टक्के भारतीय चित्रपट आहे”, असेही अतुल कुलकर्णींनी सांगितले.

त्यापुढे ते म्हणाले, “२००८ मध्ये आमिर खानचा मी जाने तू या जाने ना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आमिर खानने या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्या चित्रपटाबद्दल आम्ही आमिरच्या घरी बसून चर्चा करत होतो. त्यावेळी आमिर म्हणाला, मला फॉरेस्ट गंप हा चित्रपट आवडतो. त्यावर मी देखील मला फॉरेस्ट गंप आवडतो, असे पटकन सांगून टाकले. त्यावेळी माझ्याकडे त्या चित्रपटाची डीव्हीडी होती आणि मी-आमिर तो चित्रपट त्या निमित्ताने पाहिला. त्यावेळी अचानक मनात प्रश्न निर्माण झाला की, भारतात ही घटना घडली तर काय होईल? असा प्रश्न मला पडला आणि मी नोट्स काढायला सुरुवात केली. त्यावेळी मी लिखाण करण्यास सुरुवात केली.”

आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाला हिंदूत्ववादी संघटनेचा विरोध, पोस्टरही फाडले

“त्यानंतर पुढे अवघ्या १० दिवसांत चित्रपटाच्या कथेचा पहिला ड्राफ्ट आणि उर्वरित चार दिवसांत दुसरा ड्राफ्ट लिहून झाला. काही दिवसांमध्येच चित्रपटाची कथा लिहून पूर्ण झाली. त्यानंतर मी आमिरकडे ती स्क्रिप्ट वाचण्यासाठी दिली. पण त्याने ती वाचली नाही. आमिरने लाल सिंग चड्ढाची स्क्रिप्ट वाचण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी घेतला.

एक दिवस मी सहज त्याला भेटलो आणि त्यावेळी मी त्याला म्हटले की जर तुला स्क्रिप्ट आवडत नसेल, तर तू मला माझ्या तोंडावर नाही म्हणून सांग. मला काहीही हरकत नाही. कारण मी एक अभिनेता आहे आणि मी फक्त लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मग त्याने स्क्रिप्ट वाचण्यास होकार दिला आणि दहा सेकंदातच तो चित्रपट बनवण्यास तयार झाला. पण त्याचे हक्क मिळायला खूप वेळ लागला आणि हक्क मिळताच आम्ही शूटिंगला सुरुवात केली. त्यानंतर मग करोना आणि इतर गोष्टींमुळे चित्रपट प्रदर्शित होण्यास वेळ गेला”, असे अतुल कुलकर्णींनी म्हटले.